केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीने काही भाजीपाला पिकांची पाहणी केली असता या पिकांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त कीडनाशकांचा वापर केल्याचे आढळले आहे. या सर्व बाबी अत्यंत गंभीर स्वरूपाच्या असल्याचा निष्कर्ष केंद्रीय कृषी मंत्रालयाने नोंदविला आहे. त्यासाठी राज्यभर कीडनाशकांच्या उर्वरित अंशाच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना योग्य प्रशिक्षण देऊन शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याची मोहीम हाती घ्यावी लागत आहे. ज्याअर्थी अशी मोहीम राबवली जात आहे ते पाहता एकूणच शेती करीत असताना कीडनाशकांच्या सुयोग्य वापराचे भानही शेतकऱ्यांना येण्याची गरज आहे.

Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
Maharashtra Board Class 10th and 12th Result 2024 Date Time in Marathi
१०वी १२वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; कसा पाहाल? जाणून घ्या
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी
Using skin lightening cream can cause kidney cancer
सावधान! त्वचा उजळणारे क्रिम वापरताय तर हे नक्की वाचा…

शिवार फुलावं आणि अधिकाधिक उत्पादन यावं ही शेतकऱ्यांची स्वाभाविक इच्छा. ती प्रत्यक्षात उतरावी यासाठी त्यांचे अथक प्रयत्न सुरू असतात. यात काही गर आहे अशातला प्रकार नाही. तथापि, अमाप पीक घेण्याच्या प्रयत्नात बेसुमार कीडनाशकांचा वापर केला जातो आणि नेमकी हीच बाब मानवी जीवनाच्या मुळावर उठत असल्याचे अभ्यासातून दिसून येऊ लागले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीने काही भाजीपाला पिकांची पाहणी केली असता या पिकांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त कीडनाशकांचा वापर केल्याचे आढळले आहे. या सर्व बाबी अत्यंत गंभीर स्वरूपाच्या असल्याचा निष्कर्ष केंद्रीय कृषी मंत्रालयाने नोंदविला आहे. त्यासाठी राज्यभर कीडनाशकांच्या उर्वरित अंशाच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना योग्य प्रशिक्षण देऊन शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याची मोहीम हाती घ्यावी लागत आहे. ज्याअर्थी अशी मोहीम राबवली जात आहे ते पाहता एकूणच शेती करीत असताना कीडनाशकांच्या सुयोग्य वापराचे भानही शेतकऱ्यांना येण्याची गरज आहे. एकाअर्थी यातून मानवी जीवनाशी खेळण्याच्या गरप्रकारालाही आळा बसणार आहे.

राज्यामध्ये फलोत्पादनवाढीसाठी मोठय़ा प्रमाणात प्रोत्साहन देण्यात आले. त्यातून राज्यात फळबागा फुलल्या. ताजी फळे व भाजीपाला यांच्या केवळ उत्पादनात वाढ झाली नाही तर यायोगे महाराष्ट्रातून कृषिमालाची निर्यातही वाढली आहे. देशाच्या एकूण फळे व भाजीपाल्याच्या निर्यातीचे कृषी विभागाने नमूद केलेले आकडे पाहिले तरी त्यांची प्रचीती यावी. द्राक्षनिर्यातीत राज्याचा वाटा सर्वाधिक असून तो ९८ टक्के इतका आहे. पाठोपाठ आंबा ८५ टक्के, डाळिंब ८५ टक्के, केळी १८ टक्के यांचेही प्रमाण अधिक आहे. खेरीज इतर फळांचे प्रमाण ४८ टक्के आहे. भाजीपाल्याचा विचार करता त्याचे प्रमाण २६ टक्के आणि ग्राहक शेतकरी व शासनाच्याही नाकी दम आणणारा कांदा ४८ टक्के आहे. कृषिमाल निर्यातीतील राज्यातील वाटा टिकविणे आणि त्यामध्ये वाढ करणे असे दुहेरी आव्हान आहे. त्यासाठी कीड-रोगमुक्त व कीडनाशक उर्वरित अंशमुक्त कृषिमाल उत्पादन करणे व फक्त अशाच प्रकारचा माल निर्यात करणे हे राज्याच्या कृषी विभागाचे (फलोत्पादन) ध्येय आहे. केंद्र शासनानेसुद्धा कीड-रोग व कीडनाशक उर्वरित अंशमुक्त कृषिमाल निर्यातीची हमी आयातदार देशांना दिली आहे.

कृषिमाल निर्यातीमध्ये युरोपियन युनियनचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. युरोपियन युनियनने निर्धारित केलेली प्रमाणके व गुणवत्ताही अतिउच्च दर्जाची आहे. त्यामुळे कीडनाशक उर्वरित अंशाची फळे व भाजीपाला यांच्यामधील पातळीही युरोपियन युनियने मान्य केलेल्या क्षम्य मर्यादेपेक्षा कमी असणे आवश्यक असताना ते क्षम्य मर्यादेपेक्षा अधिक आढळून आल्याने अनेक वेळा निर्यात केलेला कृषिमाल नाकारला जाण्याच्या घटना गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आíथक फटका सहन करावा लागत असतानाच देशाच्या कृषिमालाच्या दर्जाबाबतही शंका उपस्थित केली जाते. ही नामुष्की टाळण्याची गरज आहे. सन २०१४ मध्ये सौदी अरेबिया या देशाने कीडनाशकांचे उर्वरित अंश मोठय़ा प्रमाणात आढळून आल्याने भारतातून मिरची आयातीवर र्निबध घातले आहेत.

भारतातून निर्यात होणाऱ्या फळे व भाजीपाला या कृषिमालाची देशामध्ये ‘अपेडा’ संस्थेने प्राधिकृत केलेल्या प्रयोगशाळेमध्ये कीडनाशक उर्वरित अंशाची आयातदार देशांच्या फायटोसॅनेटरी निकषानुसार तपासणी केली जाते. तपासणीमध्ये नमुना योग्य गुणवत्तेचा असल्याचा निर्वाळा दिल्यानंतरच त्यांची निर्यात केली जाते. कीडनाशक उर्वरित अंश तपासणीसाठी असे नमुने ‘अपेडा’ संस्थेने व राष्ट्रीय पीक संरक्षण संस्थेने प्राधिकृत केलेल्या पॅकहाऊसवरून घेतले जातात. अशा प्रकारे घेतलेले नमुने कीडनाशक उर्वरित अंश चाचणीमध्ये नापास झाल्याचे आढळून आल्यास त्याबाबतची माहिती क्षेत्रीय स्तरावरील विस्तार यंत्रणेस संबंधित क्षेत्रातील उत्पादकास देऊन त्याचे प्रबोधन केले जाते. कीडनाशक उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळा, पुणे येथे तपासणीमध्ये नापास झालेल्या नमुण्यांची माहिती पाठविली जाते. त्यांच्याकरवीही क्षेत्रीय स्तरावर विस्तार यंत्रणेकडून उत्पादकांचे प्रबोधन केले जाते. तथापि, अशा प्रकारचे कामही तात्पुरत्या स्वरूपाचे राहिले असून राज्यामध्ये याबाबत एक दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला असून त्याची कार्यवाही करण्यासाठी मोहीम घेतली जात आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या पथकाने चिखली जिल्हा बुलढाणा येथे कोबी व भाजीपाल्याच्या नमुन्यात केंद्राच्या अन्नसुरक्षा व गुणनियंत्रण विभागाने ठरवून दिलेल्या प्रमाणकापेक्षा अधिक कीडनाशकाचे अंश आढळून आले आहेत. कृषी विभागाच्या निरीक्षणानुसार राज्याच्या विविध भागांतील शेतकरी बेसुमार कीडनाशकांचा वापर करीत असल्याचे नमूद केले आहे. यामुळे या शेतकऱ्यांना फायदा होत असला तरी अशा फळे व भाजीपाल्याचे सेवन केल्यामुळे कर्करोग, ब्रेन हॅमरेज, अर्धागवायू अशा गंभीर आजारांची लागण होत असल्याने ग्राहकांना मोठा फटका बसतो. त्याचप्रमाणे आíथक, सामाजिक जीवनाची घडी विस्कळीत होते.

कृषी प्रशासनाच्या दक्षतेवर प्रश्नचिन्ह

बेसुमार कीडनाशकांचा वापर, त्याचे दुष्परिणाम, मानवी आरोग्यावर होणारा दुष्परिणाम हा विषय अतिशय गंभीर आहे. त्याची दखल घेऊन केंद्रीय कृषी मंत्रालयाने राज्य शासनाला पत्र पाठवून शेतकऱ्यांनी कोणती दक्षता घ्यावी याबाबत कळविले होते. त्यानुसार राज्याच्या कृषी आयुक्तालयाने (संचालक फलोत्पादन) जानेवारीत परिपत्रक काढून जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी यांना शेतकऱ्यांना प्रबोधन करण्याविषयी कळविले होते. त्याची दखल किती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी घेतली याविषयी शंका आहे. कारण ७ जून रोजी पुन्हा एकदा याच विभागाने सदर बाबीचे गांभीर्य दर्शविणारे पत्रक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पाठविले असून पूर्वीच्या परिपत्रकातील सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, जेणेकरून दिलेल्या प्रमाणकापेक्षा अधिक कीडनाशकांचे उर्वरित अंश आढळून येणार नाहीत. याबाबत खबरदारी घेण्याबरोबरच शेतकऱ्यांत जागृती करण्याबाबत सूचित केले आहे. यामुळे कृषी प्रशासन अत्यंत गंभीर स्वरूपाच्या विषयाबाबतही किती गंभीर आहे यावर प्रश्नचिन्ह लागले आहेत.

अशी घ्यावी काळजी

  • निर्यात होणारी फळे व भाजीपाला या कृषिमालांना प्राधान्य देऊन त्यांच्या कीडनाशक उर्वरित अंशमुक्त उत्पादनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. त्यासाठी भेंडी, मिरची, दुधीभोपळा, वांगी, कारली, टोमॅटो ही भाजीपाला पिके व फळ पिकांमध्ये द्राक्ष, डाळिंब यांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
  • केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती यांनी मान्य केलेल्या ‘लेबल क्लेम’बाबत शेतकऱ्यांना माहिती देऊन त्यांचा वापराबाबत अवगत करावे. त्यासाठी वर्षांतून दोन वेळा हंगामपूर्व प्रशिक्षण देण्यात यावे.
  • प्रशिक्षणामध्ये पीकनिहाय मान्य कीडनाशक असल्याने ‘लेबल क्लेम’ व कीडनाशके वापरण्याचे प्रमाण, त्यांच्या वापरानंतर काढणीपर्यंतचा प्रतीक्षाधीन कालावधी (पीएचआय), फवारणी, यंत्रांचे कॅलिब्रेशन, निगा, दुरुस्ती इत्यादीचे महत्त्व, वापरासाठी बंद असलेली कीटकनाशके, एकात्मिक कीड व्यवस्थापन इत्यादी बाबींचा समावेश केला पाहिजे.
  • कीडनाशके उर्वरित अंशाची पातळी कमी राहण्यासाठी मान्य केलेली जैविक कीडनाशके, वनस्पतिजन्य कीडनाशके, सापळा पिके, विविध कीडनियंत्रण सापळे इ. उपाययोजनांच्या वापरावर भर देण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे.
  • भारतात बंदी असलेली कीडनाशके, कमी दर्जाची कीटकनाशके, वैधता मुदतबाहय़ झालेली कीटकनाशके, संबंधित पिकाला ‘लेबल क्लेम’ मान्य नसलेली कीटकनाशके यांचा वापर शेतकऱ्यांनी करू नये यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे.
  • एकात्मिक कीड व्यवस्थापन करण्यामध्ये कामगंध सापळ्याचे अतिशय महत्त्व आहे; परंतु त्यासाठी वापरण्यात येणारी ल्युर किंवा कामगंध द्रव्ये ही दर पंधरवडय़ास बदलली पाहिजेत. ती न बदलल्यामुळे अपेक्षित परिणाम दिसून येत नाही.
  • शेतावर फवारणी केलेल्या कीडनाशकांच्या माहितीचे अभिलेख ठेवण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. त्यामुळे काढणीपूर्व कोणते कीटकनाशक वापरले होते. याबाबत नमुना प्रयोगशाळेत नापास झाल्यास नेमका शोध घेता येऊन पुढील वेळी चूक घडणार नाही. याविषयीची दक्षता घेता येईल.

dayanandlipare@gmail.com