मान्सूनच्या विलंबाचा पेरणीवर परिणाम नाही’ यंदा मान्सूनला विलंब झाला तरी त्याचा पेरणीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मोसमी वाऱ्यांची वाटचाल पाहता ७ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन अपेक्षित आहे. प्रसारमाध्यमांनी मान्सून काही दिवस लांबणीपर पडेल अशी शक्यता वर्तविली होती. भारतीय हवामान विभागाचे प्रमुख लक्ष्मण सिंग राठोड म्हणाले की, सलग दोन वर्षे दुष्काळी परिस्थितीनंतर यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज आहे. भारतातील शेती मोठय़ा प्रमाणावर मान्सूनवर अवलंबून आहे. मान्सून १ जून रोजी केरळमध्ये येईल त्यानंतर जुलैच्या मध्यांतराला संपूर्ण देशात मान्सून कार्यान्वित होईल. मोसमी वाऱ्यांचा वेग पाहता पेरणीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे राठोड यांनी यावेळी स्पष्ट केले. डाळींचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्राचा कृती आराखडा डाळींच्या आयातीवरील खर्च कमी करण्यासाठी केंद्राने ठोस पाऊल उचलले असून उत्पादन वाढविण्यासाठी पाच वर्षांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. २०१५-१६ या वर्षांत डाळींचे १७.०६ दशलक्ष टन उत्पादन झाले असून हे उत्पादन २०२०-२१ या वर्षांत २४ दशलक्ष टनांपर्यंत वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यांतील डाळ उत्पादन वाढविण्यासाठी केंद्राने हा आराखडा तयार केला आहे.