गेल्या महिनाभरापासून बाजारपेठेत भाज्यांची आवक मोठय़ा प्रमाणावर होत असल्यामुळे भाज्यांच्या भावाने नीचांकी पातळी गाठली आहे. खिन्न अंतकरणाने मिळेल त्या भावाने भाज्या विकण्याला शेतकऱ्याकडे पर्याय नाही. कारण दोन दिवस माल विकायला उशीर झाला तरी मालाची विक्रीच होत नाही. या वर्षी खरीप हंगामापासूनच कृषी विभागाने कांद्याचे क्षेत्र वाढवण्यावर भर दिला होता. त्याला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला खरा, मात्र खरीप हंगामात पाऊस गायब झाल्यामुळे रब्बी हंगामात कांद्याचे क्षेत्र वाढले. ज्यांनी लवकर पेरा केला त्यांना भावही चांगला मिळाला, ज्यांनी उशिरा पेरा केला ते मात्र कचाटय़ात सापडले.

गेल्या काही वर्षांत हवामान बदलाचे चटके आपल्याला सहन करावे लागत आहेत. फेब्रुवारी महिन्यात गारपीट, अवकाळी पाऊस, एकाच दिवशी हिवाळा, पावसाळा अन् उन्हाळा या तिन्ही ऋतूंचा अनुभव अनेकांनी घेतला. हवामानातील हे बदल स्वीकारण्याला आता पर्याय नाही. आतापर्यंत पावसाळा आला की भाज्यांचे भाव पडतात अन् उन्हाळा आला की भाव वाढतात असा सर्वसाधारण अनुभव लोकांच्या गाठीशी होता. या वर्षी दुष्काळाच्या चटक्यामुळे पाणी कमी झाले. उन्हाळ्यात पाणी कमी पडणार असल्यामुळे नोव्हेंबर महिन्यातच ज्याच्याकडे थोडेबहुत पाणी आहे अशा शेतकऱ्यांनी भाजीपाला घेण्याचे ठरवले. कमी कालावधीत, कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळेल या आशेपोटी टोमॅटो, वांगी, दोडके, भेंडी, पालक, गवार, गाजर, कांदे, कोथिंबीर अशा भाज्यांचे उत्पादन घेतले. पाण्याने तग दिल्यामुळे काहीजणांनी प्रसंगी टँकरने पाणी विकत घेऊन भाज्या वाढवल्या. दरवर्षीप्रमाणे उत्पादन झाले नाही, कारण पाणी कमी पडले. बाजारपेठेत चांगला भाव मिळाला तर खर्च वजा जाता काही पदरी पडेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात घडले मात्र विपरीतच.

गेल्या महिनाभरापासून बाजारपेठेत भाज्यांची आवक मोठय़ा प्रमाणावर होत असल्यामुळे भाज्यांच्या भावाने नीचांकी पातळी गाठली आहे. त्यामुळे मिळेल त्या भावाने भाज्या विकण्याला शेतकऱ्याकडे पर्याय नाही. कारण दोन दिवस माल विकायला उशीर झाला तरी मालाची विक्रीच होत नाही. या वर्षी खरीप हंगामापासूनच कृषी विभागाने कांद्याचे क्षेत्र वाढवण्यावर भर दिला. त्याला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला, मात्र खरीप हंगामात पाऊस गायब झाल्यामुळे रब्बी हंगामात कांद्याचे क्षेत्र वाढले. ज्यांनी लवकर पेरा केला त्यांना भावही चांगला मिळाला, ज्यांनी उशिरा पेरा केला ते मात्र कचाटय़ात सापडले. जिल्हय़ातील चाकूर तालुक्यातील वडवळ परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. संपूर्ण देशातील बाजारपेठेबरोबर थेट पाकिस्तानलाही या ठिकाणाहून टोमॅटो निर्यात केले जातात. टोमॅटोच्या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती, त्याची निगराणी, बाजारपेठेचा अंदाज याबाबतीत येथील शेतकरी अतिशय सजग आहेत. जानेवारी महिन्यापासून दररोज सुमारे ६०० ते ७०० टन टोमॅटो देशातील जम्मू, दिल्ली, मुंबई, मेंगलोर, डेहराडून आदी बाजारपेठांत पाठवला जातो. २५ किलोच्या टोमॅटोला सध्या ठोक १२० रुपये भाव आहे. म्हणजे प्रतिकिलो ४ रुपये मिळतात. या भावामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही निघत नाही. वडवळ येथील टोमॅटोची विक्री करणारे व्यापारी वहाब पटेल यांनी शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे. पाणीपातळी अतिशय कमी झाली आहे. अत्यंत कष्टातून शेतकऱ्यांनी उत्पादन घेतले. भाव मिळत नाही व माल ठेवून उपयोग नाही म्हणून शेतकऱ्यांना तो विकावा लागतो आहे. दुष्काळाच्या काळात भाजीपाल्याची साथ मिळेल ही आशा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांना निराशेला सामोरे जावे लागले असल्याचे सांगितले.

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील हेर येथील आनंद पटेल या शेतकऱ्यानेही सहा एकरवर टोमॅटोचे उत्पादन घेतले. त्यांच्या शेतात तीन िवधन विहिरी आहेत. दोन िवधन विहिरींचे पाणी कमी झाले व एकावर त्यांनी टोमॅटो पोसला. मात्र, या वर्षी उत्पादनात घट झालीच शिवाय भाव न मिळाल्याने खर्चही निघाला नसल्याचे ते म्हणाले. लातूर तालुक्यातील सेलू येथील नंदकुमार पवार या शेतकऱ्याने सव्वा एकर टोमॅटोचे उत्पादन घेतले. १ लाख ७० हजार रुपये भांडवली गुंतवणूक केली व निर्यातक्षम टोमॅटो उत्पादित केले. त्याला भाव चांगला नसल्यामुळे पवारांची निराशा झाली.

औराद शहाजनी येथील सत्यवान मुळे या शेतकऱ्याने आठ एकरवर वांग्याचे उत्पादन घेतले. मात्र, भाव २ रुपये किलो इतकाच मिळत असल्यामुळे सुमारे सात एकरवरील वांग्याचा तोडाच केला नसल्याचे त्यांनी सांगितले. कारण माल विकून मजुरीचेही पसे निघत नसल्याचे ते म्हणाले.

फुलकोबी ४ रुपये किलो, भोपळा ५ रुपये किलो, मेथी २ रुपये पेंडी असे भाव मिळत असल्यामुळे हाती काहीच शिल्लक राहात नाही. देशातील जवळपास सर्वच प्रांतात या वर्षी भाजीपाल्याचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर घेतले गेले. महिनाभरापूर्वी गुजरातचा भाजीपाला बाजारपेठेत आल्यामुळे महाराष्ट्रातील भाव पडले. बंगळुरू, मंगलोर या कर्नाटक प्रांतातील शेतकऱ्यांचा माल मोठय़ा प्रमाणावर बाजारपेठेत दाखल झाला त्यामुळेही भाव पडले. मार्च अखेरनंतर नारायणगाव बाजारपेठेत टोमॅटोची आवक सुरू होते. दररोज सुमारे २ हजार टन टोमॅटो मुंबई येथील बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवले जातात. विक्रमी उत्पादन झाले असल्यामुळे मे अखेपर्यंत बाजारपेठेत भाजीपाल्याचे भाव वाढण्याची शक्यता नसल्याचे नारायणराव येथील भाजीपाल्याचे ठोक विक्रेते श्रीराम गाढवे यांनी सांगितले.

जून, जुल महिन्यामध्ये भाजीपाल्याचे भाव वाढतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. आपल्या देशात सुमारे ४७ टक्के भाजीपाल्याचे उत्पादन वाया जात असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर उत्पादन वाया जाते, मात्र त्यासाठी उपाययोजना होत नाहीत. आपल्या देशात शेतकऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. सिंचनाची सुविधा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्याचे प्रमाण कमी आहे. बाजारपेठेत एखाद्या वस्तूचे भाव वाढले की शेतकरी तातडीने त्याचे उत्पादन घेतात व नंतर प्रचंड प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान होते. या वर्षी कांदा उत्पादकांना ८३ टक्के भावातील घसरण सहन करावी लागली आहे. भाजीपाल्याचे होणारे नुकसान, कमी भाव याबाबतीत काय उपाययोजना करायला हव्यात यासंबंधी एकाही शेतकरी संघटनेच्या नेत्याला ठोस काही सांगता आले नाही.

शेतकरी नेमके काय उत्पादन घेतो आहे? बाजारपेठेत कोणता माल येईल? याचा अंदाज शासकीय यंत्रणेलाही नसतो. खाजगी मंडळींना याचा अंदाज येत असला तरी ते तेजी-मंदीचा लाभ स्वतला कसा उठवता येईल याकडेच लक्ष देतात. परिणामी शेतकरी उघडय़ावर येतो. भाजीपाला दीर्घकाळ साठवून ठेवण्यासाठी शीतगृहाची मालिका करणे, मालाची छाननी करून त्याची योग्य वेष्टन व्यवस्था निर्माण करून अन्य शेतमालाप्रमाणे टप्प्याटप्प्याने बाजारपेठेत तो दाखल कसा करता येईल यासंबंधीचे मार्गदर्शन करणे, निर्यातीला प्रोत्साहन देणे, त्यासाठीचे प्रशिक्षण देणे या बाबींवर भर दिला गेला तरच शेतकऱ्याला थोडे अधिक पसे मिळू शकतात. मात्र या प्रश्नाचे मूलभूत चिंतन केले जात नाही हीच शोकांतिका आहे.

जीवनावश्यक वस्तूचा कायदा रद्द करावा

शेतमालाचे उत्पादन वाढले व भाव पडले तर त्याला हमी दिली जात नाही, मात्र उत्पादन कमी झाले व भाव वाढले तर जीवनावश्यक वस्तूच्या कायद्याचा बडगा दाखवत निर्यातबंदी केली जाते व शेतकऱ्याला पसे मिळू दिले जात नाहीत. शेतकऱ्यांची कोंडी करणारे असे कायदे रद्द केले पाहिजेत असे मत शेतकरी संघटनेचे कार्यकत्रे अमर हबीब यांनी व्यक्त केले.

pradeepnanandkar@gmail.com