शेती हा व्यवसाय तोटय़ाचा, त्यातून घर चालवणेही अवघड! त्यामुळे संपूर्ण आयुष्य अंथरुण पाहून पाय पसरतच काढावे लागणार, असा सार्वत्रिक समज आहे. एकत्र कुटुंबातून वेगळे झाल्यानंतर प्रापंचिक जबाबदारी पडल्यावर कोणतीही ऐपत नसताना स्वतची पत निर्माण करायची, या जिद्दीने काम करीत अवघ्या सहा एकर शेतीतून एक कोटी रुपये ‘पत’ मिळविण्याची किमया लातूरजवळील सिकंदरपूर गावातील सिंधू उगीले या महिलेने करून दाखवली आहे.

१९९२ मध्ये सोलापूर जिल्हय़ातील मोहोळ गावच्या सिंधू यांचा लातूर तालुक्यातील सिकंदरपूर येथील जेडी आर्टपर्यंतचे शिक्षण झालेल्या दिलीप उगीले यांच्याशी विवाह झाला. उगीले कुटुंबाची २१ एकर जमीन, तीन भाऊ असे एकत्र कुटुंब होते. दिलीप उगीले लातूरच्या मूकबधीर विद्यालयात नुकतेच शिक्षक म्हणून रुजू झाले होते. अजून पगारही सुरू झाला नव्हता. लग्नानंतर मोठय़ा भावाने वाटणीची मागणी केली अन् सहा एकर जमीन, बल व म्हैस प्रत्येकाच्या वाटय़ाला आली. लातूर शहरात राहणाऱ्या दिलीप व सिंधू दाम्पत्याला मोठा प्रश्न पडला. मात्र, पर्यायच नसल्यामुळे दोघांनी शेतात राहण्याचे ठरवले व अतिशय जिद्दीने शेती करण्यास सुरुवात केली.
प्रारंभी कोरडवाहू व नंतर पाण्याची शेती करण्यासाठी विंधनविहिरी घेतल्या. उपलब्ध पाणी जपून वापरायचे ठरवून त्यांनी १९९३-९४ च्या काळात ठिबकवर भाजीपाला करण्याचे ठरवले. ठिबक खरेदी करण्यास गेल्यानंतर तुमची शेती किती आहे व कशासाठी ठिबक करीत आहात, तुम्हाला हे परवडणार नाही, असे विक्रेता म्हणाला. मात्र, उगीले दाम्पत्याने ठिबकची खरेदी करून एका एकरात ४० टन वांग्याचे उत्पादन घेतले. त्यातून आत्मविश्वास वाढला. तेवढय़ाच शेतीत वेगवेगळे प्रयोग सुरू झाले.
नंतर द्राक्षबाग केली. द्राक्षाची फारशी माहिती नव्हती. मात्र, परिसरातील लोकांना भेटून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन द्राक्षाचे उत्पादन चांगले निघाले व पहिल्याच वर्षी द्राक्षाची निर्यात झाली. काही वष्रे द्राक्षाची शेती केली. त्यानंतर काही प्रमाणात उसाचे उत्पादन घेतले. जे करायचे ते उत्तम दर्जाचे हा ध्यास घेऊन अतिशय उत्तम दर्जाचे उसाचे उत्पादन घेतले. हैदराबाद येथील इक्रीसॅट संस्थेने लातूर परिसरात उसाचे एकरी उत्पादन का वाढत नाही याचा अभ्यास करण्यासाठी एक टीम पाठवली. या टीमने उगीले यांच्या शेतीची पाहणी केली. त्यावर्षी उगीलेंच्या शेतात एकरी ९६ टन असा उसाचा विक्रमी उतारा मिळाला. इक्रीसॅटच्या संस्थेने सिंधू उगीले यांची घेतलेली मुलाखत आजही त्यांच्या संकेतस्थळावर आहे.
उसात भुईमूग, उडीद, कांदा अशी पिके घेऊन त्यांनी शेतीत अधिक उत्पादन कसे घेता येऊ शकते याचा आदर्श उभा केला. त्यांच्याकडील ६ एकर शेतीपकी १ एकर क्षेत्रावर शेततळे तयार करण्यात आले. त्यात १ कोटी लिटर पाणी साठवण क्षमता आहे. दुष्काळातही उगीले यांच्याकडे दीड एकर शेवगा, एक एकर द्राक्ष, एक एकर केळी व एक एकरचे पॉलिहाऊस आहे. या वर्षी ५० टन केळीचे उत्पादन त्यांनी घेतले. केळीतून सुमारे ३ लाख मिळाले. सध्या शेवग्याची विक्री सुरू असून ३ हजार रुपये क्विंटल भावाप्रमाणे आतापर्यंत त्यांनी ४ टन शेवगा विकला. किमान १० टनाचे उत्पादन त्यांना अपेक्षित आहे.
२०१४ मध्ये एक एकर शेतात त्यांनी पॉलिहाऊस उभे केले व २० टन क्षमतेचे शीतगृह उभारले. या साठी सुमारे ५० लाखांची गुंतवणूक केली. या पॉलिहाऊसमध्ये गुलाबाचे उत्पादन सुरू केले. औरंगाबाद, परभणी, नांदेड, सोलापूर, लातूर याबरोबरच औरंगाबाद येथील रिया कंपनीमार्फत जयपूर, दिल्ली, जबलपूर या बाजारपेठेत गुलाबाची विक्री होते. विविध रंगांचे गुलाब तयार करताना त्यासाठी डोळय़ात तेल घालून देखरेख करावी लागते. गुलाबाचे फूल तोडल्यानंतर १० मिनिटांत त्याला शीतगृहात ठेवावे लागते, तरच त्यातील ओलावा कमी होतो व त्यानंतर फूल २० दिवस टिकते. बाजारपेठेतील भावाची चढ-उतार लक्षात घेऊन विक्रीसाठी फुले पाठवली जातात. एक एकरात वर्षभरात सुमारे १० ते ११ लाख गुलाबाची फुले निघतात.
‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने फुलांना सर्वाधिक भाव मिळतो. लग्नसराईतही भाव चांगला असतो. मात्र, एरवी अतिशय पडत्या भावाने गुलाब विकावा लागतो. सरासरी ५ रुपये भावाने फूल विकले जाते. दरवर्षी उन्हाळय़ात लातूर परिसरात ४४ अंशापर्यंत तापमान असते. या स्थितीत गुलाबाचे उत्पादन घेता येईल का? हा प्रश्न होता. मात्र, बारीकसारीक अभ्यास करून सिंधू उगीले यांनी गुलाब फुलवला.
आपल्या सहा एकर शेतीत कायमस्वरूपी सात महिलांना रोजगार त्यांनी देऊ केला आहे. २००६ मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचे ६ हजार रुपयांचे कर्ज त्यांनी घेतले होते. आता त्यांची बँकेतील पत एक कोटीची आहे. बँकेकडून घेतलेले कर्ज वेळेत फेडले. दुष्काळी स्थितीत त्यांनी या वर्षी बँकेचे १५ लाख रुपये फेडले. शेती करणे सोपे नाही. तो २४ तासांचा व्यवसाय आहे. पाण्याचे योग्य नियोजन, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व गणित यांचा उपयोग शेतीत चांगला होत असल्याचे बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या सिंधू उगीले यांचे म्हणणे आहे. आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीत करता येऊ शकतो याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करण्यासाठी स्वत सर्व माहिती घेतली पाहिजे. कोणतेही काम इतरांवर विसंबून ठेवून चालत नाही. व्यवस्थापनकौशल्य याचा अर्थ सर्व कामे आपल्याला आली पाहिजेत. किमान ती करून घेण्याचे कसब अंगी असले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.पुरुषांपेक्षा महिला शेतीत उतरल्या तर त्या अधिक चांगल्या पद्धतीने शेती करू शकतात, हे आपण दाखवून दिले. अर्थात, बाजारातून औषधे आणण्यापासून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात पतीचा मोठा वाटा असल्याचे त्या सांगतात.

पश्चिम महाराष्ट्रासमोर आदर्श
गुलाबाची शेती पश्चिम महाराष्ट्राला नवी नाही. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी २५ वर्षांपासून कोटय़वधीची उलाढाल करतात. पाण्याची साथ आहे व दळणवळणाची साधनेही उपलब्ध आहेत. उसाप्रमाणेच फुलशेतीलाही भरपूर पाणी लागते, असा एकेकाळी आरोप होत होता. मात्र, कमी पाण्यावर मराठवाडय़ासारख्या अति तापमानाच्या भागात गुलाबाची शेती यशस्वीरीत्या करून सिकंदरपूरच्या सिंधू उगीले यांनी वेगळा आदर्श ठेवला आहे.

पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर
आपल्या सहा एकर शेतीत पडणाऱ्या पावसाचा एकही थेंब वाया जाणार नाही याची काळजी उगीले कुटुंब घेत असून पॉलिहाऊसवर पडणारे पावसाचे पाणी एकत्र गोळा केले जाते. ते पाणी शुद्ध असल्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया न करता थेट त्याचा वापर केला जातो. संपूर्ण शेती ठिबकवरच केली जाते. कोणत्याही पिकाला अथवा झाडाला पाटाने पाणी दिले जात नाही. पाण्याची किंमत करता आली तरच शेती करता येते, असे सिंधू उगीले आग्रहाने सांगतात.
प्रदीप नणंदकर -pradeepnanandkar@gmail.com