आजवर एकाच ठिकाणी नोकरी करणाऱ्या पिढीचे रेशनकार्डवर असणारे कुटुंब, मुलामुलीच्या नोकरीनिमित्ताने खिशात पासपोर्ट घेऊन स्थलांतर करू लागले आहे. अर्थातच एकाच छताखालच्या कुटुंबाची व्याख्या बदलू लागली आहे. आणि त्याचबरोबर दोन पिढय़ांच्या समस्याही. त्यानिमित्ताने २५ वर्षांनंतरच्या कुटुंबव्यवस्थेचा वेध घेणारे सर्वेक्षण..

तज्ज्ञ सहभाग : प्रो. देवी प्रसाद, प्राजक्ता पाडगावकर / सर्वेक्षण सहभाग : राधिका कुंटे, मृणाल भगत, वेदवती चिपळूणकर, कोमल आचरेकर, अक्षय मांडवकर, सौरभ नाईक / सर्वेक्षण संयोजन : सुहास जोशी

या सर्वेक्षणासाठी बहुमूल्य वेळ देणाऱ्या सर्व कुटुंबांचे आभार.

———————————

जनरेशन गॅप.. दोन पिढय़ांतील अंतर हा विषय प्रत्येक पिढीसाठी जिव्हाळ्याचा. ही गॅप रुंदावणारे घटक सातत्याने वाढत असले तरीही गेल्या वीस वर्षांत कुटुंबातील दोन पिढय़ा हे अंतर कापण्याचे प्रयत्नही करीत आहेत, हे मान्य करावेच लागेल. काळाशी जुळवून घेणे असे म्हणत हे अंतर कमी करण्याचे प्रयत्न आधीच्या पिढीकडून मोठय़ा प्रमाणावर होत आहेत.

भारतीय कुटुंबव्यवस्था हा आपल्याला अभिमान असणाऱ्या अनेक गोष्टींपैकी एक. मोठी कुटुंबे, जोडलेली माणसे, पै-पाहुण्यांचे येणे-जाणे आणि नातेवाईकांचा लिप्ताळा असे भारतीय कुटुंबाचे सर्वसाधारण चित्र. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही अशी मोठी एकत्र कुटुंबे दिसतात. पण शहरांतील चित्र पुरते बदलले आहे आणि या बदलालाही पुष्कळ काळ लोटला आहे. कुटुंबप्रमुख म्हणून घरातील वडिलांची एकाधिकारशाही आता दिसत नाही. घरातील स्त्री नुसती कमावती झाली असे नाही, तर निर्णयप्रक्रियेतही ती महत्त्वाची भूमिका बजावताना दिसते आहे. स्त्रियांना मिळालेल्या आर्थिक स्वातंत्र्यामुळे तिच्या विचारसरणीत बदल होताना दिसताहेत. त्याचे परिणाम कुटुंबावर नक्कीच
16-lp-diwali-2016दिसून येणारे आहेत. नवीन रचनेतील विभक्त कुटुंब (न्यूक्लिअर फॅमिली) किंवा छोटी कुटुंबव्यवस्था अंगवळणी पडली आहे. तरीही जागतिकीकरणाच्या लाटेनंतर यातही काही मोठे बदल होऊ लागले आहेत. त्यातला सर्वात मोठा बदल म्हणजे कुटुंबातील व्यक्तींचे वाढलेले स्थलांतर.

कुटुंबाने एकाच शहरात, वडिलोपार्जित घरात एकत्र नांदायचे, हा आदर्श आता उरलेला नाही. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन आई-वडील, मुला-बाळांसह देशभर, जगभर नोकरीसाठी खरे तर करिअरसाठी फिरणारी तरुण पिढी आता सर्वमान्य होते आहे. आयुष्यभर एका शहरात, एका घरात राहिलेली मंडळी आणि बदली होईल म्हणून बढती नाकारणारी पिढी आता नव्या पिढीच्या करिअरसाठी आणि त्यांना मिळणाऱ्या चांगल्या संधीसाठी नोकरी, घर, शहर, देश बदलण्याच्या त्यांच्या निर्णयाला पाठिंबा देत आहे. नुसता पाठिंबाच नाही तर त्यांच्याबरोबर घर आणि शहरेही बदलत आहेत, स्थलांतरित होत आहेत. एका छताखालच्या कुटुंबाची व्याख्या, कुटुंबाचा पसारा आणि प्राधान्यक्रम या गोष्टी बदलत चालल्या आहेत. त्यातून एकुलते एक अपत्य असणारी पिढी आता उतारवयाला लागलेली आहे. तिचे प्रश्न वेगळे आहेत. त्यांची मानसिकता वेगळी आहे. स्थलांतरामुळे विभक्त कुटुंब  रचनेतील छोटी कुटुंबेदेखील विखुरली गेली आहेत. याचा एकूणच कुटुंबव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे दिसत आहे. अर्थातच समाजरचनेवरही याचे पडसाद उमटत आहेत.

वार्धक्याकडे झुकलेली आधीची पिढी आणि नवीन क्षितिजे खुणावत असणारी ‘ग्लोबल’ नवी पिढी यांना सांधण्यासाठी काय करावे याबाबत आधुनिक समाजातही गोंधळ दिसतो. एकटय़ा वृद्धांना सामावून घेणारी आणि त्यांची काळजी घेणारी समाजव्यवस्था आपल्याकडे तयार व्हायला नुकतीच सुरुवात झाली असली तरी त्या दृष्टीने मानसिकता तयार झाली आहे का? याला समांतर आणि सक्षम व्यवस्था कोणती, आता उतारवयाकडे झुकलेली पिढी कुठली सपोर्ट सिस्टीम उपयुक्तमानते? वृद्धाश्रम या शब्दाभोवती असणारी नकारात्मकता कमी झालेली आहे की तशीच आहे? ग्लोबल फॅमिलीमध्ये वृद्धांना कसे सामावून घ्यायचे? या प्रश्नांची वेळीच उत्तरे शोधली नाहीत तर पुढील वीस वर्षांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

या ग्लोबल फॅमिलीचे भवितव्य काय असेल हे शोधण्यासाठी या कुटुंबातील सदस्य सध्या कोणत्या मानसिक स्थित्यंतरामधून जात आहेत, हे शोधणे आवश्यक आहे. नव्या कुटुंबाचे प्राधान्यक्रम काय आहेत, भविष्याबाबतचे विचार आणि तरतूद कशी आहे हे जाणून घेत त्यातून या ग्लोबल फॅमिलीचे भवितव्य काय असेल याचा अंदाज बांधण्यासाठी ‘लोकप्रभा’ दिवाळी अंकाच्या निमित्ताने एक सर्वेक्षण करण्याचे ठरले. कारण परिस्थिती नेमकी काय आहे याचा अंदाज आल्याशिवाय त्यावर उपाय, सक्षम पर्याय शोधण्याची प्रक्रिया सुरूच होऊ शकत नाही.

पूर्वीच्या कुटुंबाची ओळख असणारे – कुटुंबप्रमुखासह सर्वाची नावे, वय असणारे, कायमच्या निवासाचा दाखला किंवा पुरावा ठरणारे – रेशनकार्ड आता गायब होते आहे आणि पासपोर्ट खिशात असलेली नवीन ग्लोबल फॅमिली उदयाला येते आहे. या नव्या कुटुंबांचा रेशनकार्ड ते पासपोर्ट हा प्रवास होत असताना ती कुटुंबे अनेक स्थित्यंतरातून गेली आहेत, जात आहेत. या स्थित्यंतरांचा मागोवा घेत भविष्याचा अंदाज बांधण्याच्या उद्देशाने हे सर्वेक्षण केले गेले. त्यातून उलगडलेली बदलत्या कुटुंबाची बदलती गोष्ट मांडण्याचा हा छोटा प्रयत्न.

सर्वेक्षणाचा उद्देश, पद्धत, मर्यादा

वेगवेगळ्या कौटुंबिक पाश्र्वभूमीच्या व्यक्तींशी बोलून हे सर्वेक्षण केले. त्यातील ९२ टक्के जणांशी प्रश्नावलीला धरून सविस्तर चर्चा केली. कुटुंबातील सर्व सुजाण व्यक्तींशी स्वतंत्रपणे चर्चा करून त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न यात होता. कुटुंबातील ज्येष्ठ पिढीसाठी एक आणि तरुण पिढीसाठी एक अशा दोन प्रश्नावली त्यासाठी तयार केल्या. सर्वेक्षणासाठी कुटुंबाची व्याख्या करताना लग्न झालेले दाम्पत्य आणि दोघांपैकी एकाचे पालक अशा चौघांचे कुटुंब मानण्यात आले. या कुटुंबांतील तरुण पिढीचे सदस्य २७ ते ४९ वर्षांदरम्यान आहेत तर ज्येष्ठ पिढीतील सदस्य साधारण ५० ते ७९ दरम्यान आहेत. सर्वेक्षणासाठी मुद्दाम वेगवेगळ्या कौटुंबिक पाश्र्वभूमीचा, वेगवेगळ्या समाजातील कुटुंबांचा समावेश केला होता. भविष्यातील प्रातिनिधिक चित्र शोधण्याच्या उद्देशाने कायम एकाच शहरात राहिलेल्या कुटुंबांबरोबरच नोकरी-व्यवसायासाठी दुसऱ्या शहरात स्थलांतर केलेल्या, परदेशात राहणाऱ्या कुटुंबांकडून प्रश्नावलीनुसार सविस्तर चर्चा 17-lp-diwali-2016केली. एकत्र राहणाऱ्या किंवा स्वतंत्र राहणाऱ्या कुटुंबातील जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत पोचून त्यांची वैयक्तिक मते जाणून घ्यायचा उद्देशही या प्रश्नावलीतून पूर्ण झाला. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य अधिक मनमोकळेपणाने या विषयावर बोलले, असे सर्वेक्षणाअंती लक्षात आले.

सर्वेक्षणासाठी गृहीत धरलेली कुटुंबे मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय होती. समाजातील सर्व आथिर्क स्तर या सर्वेक्षणासाठी गृहीत धरणे योग्य वाटले नाही, कारण आथिर्क परिस्थितीनुसार प्राधान्यक्रम बदलतात आणि जागतिकीकरणानंतर स्थलांतराचा कुटुंबावर अधिक परिणाम झालेला मध्यम आणि उच्च मध्यमवर्गच असल्यामुळे त्यांचाच विचार केला. त्या अर्थाने या सर्वेक्षणाचे निष्कर्ष सर्व आथिर्क वर्गाना लागू होऊ शकत नाहीत. महाराष्ट्रातील शहरी भागातील कुटुंबांचाच यात समावेश केला गेला ही आणखी एक मर्यादा. सर्वेक्षणाचा आवाका या अर्थाने मर्यादित असला तरीही दोन पिढय़ांची प्रातिनिधिक मानसिकता जाणून घेण्याचा प्राथमिक उद्देश यातून नक्कीच पूर्ण झाला असे म्हणता येईल. अशी मानसिकताच समूहाचा विचार बनते या अर्थाने हे सर्वेक्षण प्रातिनिधिक ठरेल. सर्वेक्षणातील मुद्दय़ांचा विचार करण्याआधी आणखी काही गोष्टींचे स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. या सर्वेक्षणापुरते स्थलांतर म्हणजे कायमचे दुसरीकडे राहणे असा अर्थ घेतलेला नसून महिनाभरापेक्षा अधिक कालावधीसाठी वारंवार केलेले स्थलांतरही गृहीत धरलेले आहे. वर्षांतून तीन-तीन महिने मुलांकडे परदेशात जाणाऱ्या पालकांनाही ते स्थलांतर करतात, असे म्हटले आहे आणि त्यांचा स्थलांतराचा कालावधी आणि वारंवारिता नोंदवण्यात आलेली आहे.

रेशनकार्ड होतेय बाद

सरकारदरबारी रेशनकार्ड या दस्तावेजाचे महत्त्व काय आणि त्याऐवजी आता आधारकार्ड आले आहे हा विचार क्षणभर बाजूला ठेवून रेशनकार्ड आहे का, हा प्रश्न या सर्वेक्षणासाठी का विचारला हे लक्षात घेतले पाहिजे. रेशनकार्डवरचे कुटुंब पूर्वी एका छताखालचे कुटुंब म्हणून ग्राह्य़ धरले जायचे. त्यावर रीतसर एकाचे नाव कुटुंबप्रमुख म्हणून लिहिलेले असायचे. आताच्या कुटुंबाला या सगळ्याबद्दल काय वाटते, हे 18-lp-diwali-2016जाणून घ्यायचा यामागचा उद्देश होता. आता अशा प्रकारे कुटुंबप्रमुख कुणी एक व्यक्ती असते हे पटत नाही, असे अनेकांनी सांगितले. आमच्या घरात कुणीच कुटुंबप्रमुख नाही किंवा सगळेच कुटुंबप्रमुख आहेत, अशीही उत्तरे अनेकांनी दिली. रेशनकार्डवरील कुटुंबरचनेची उतरंड तेथेच बाद झाली, असे यावरून म्हणता येईल. रेशनकार्डवरचे कुटुंब ही मागच्या काळातील प्रतीकात्मक संकल्पना म्हणून विचारात घेतली. सर्वेक्षणादरम्यान रेशनकार्डवरील कुटुंब आणि प्रत्यक्षातील कुटुंब यात चांगलीच तफावत आहे, असे लक्षात आले. आधीच्या पिढीतील बहुतेकांकडे रेशनकार्ड आहे. ज्येष्ठांपैकी केवळ एका व्यक्तीने रेशनकार्ड नसल्याचे सांगितले. तरुण पिढीतील ११ टक्के जणांकडे रेशनकार्ड नाही आणि आहे त्यांचे कार्डही अद्ययावत नाही. रेशनकार्डाचे नूतनीकरण करून घ्यायची गरज वाटत नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. रेशनकार्डवर कुटुंबप्रमुख म्हणून एकाचे नाव आणि त्याखाली कुटुंबातील इतरांची नावे आणि वय असे लिहिण्याची पद्धत असते. बहुतेकांच्या रेशनकार्डवर अजूनही कुटुंबप्रमुख म्हणून घरातील वडीलधाऱ्यांचे (वडील, सासरे, वगैरे) नाव आहे. लग्न झालेल्या तरुण स्त्रियांपैकी खूप कमी जणींचे नाव रेशनकार्डावर आलेले आहे. रेशनकार्ड एक सरकारी डॉक्युमेंट म्हणून आणि एका छताखालील कुटुंबाची व्याख्या करणारे साधन म्हणून दोन्ही अर्थाने बाद झाले आहे, हे यातून स्पष्ट होते. रेशनकार्ड बाद होताना पासपोर्ट हे महत्त्वाचे डॉक्युमेंट मात्र बहुतेकांकडे आहे आणि त्याची गरज असल्याचेही सगळे मान्य करतात. अगदी स्थलांतर न झालेल्या कुटुंबांकडेही पासपोर्ट आहे किंवा त्यांना तो काढायचा आहे. आमच्या सर्वेक्षणात नव्या पिढीतील केवळ दोघांकडे अद्याप पासपोर्ट नाही आणि आधीच्या पिढीतील तिघांकडे तो नाही.

एकत्र कुटुंब- तेव्हा आणि आज

एकत्र कुटुंबाची व्याख्या बदलूनदेखील जमाना झाला. तरीही एकत्र कुटुंब म्हटल्यावर दोन पिढय़ांचे उत्तर वेगवेगळे आले. ज्येष्ठांना एकत्र कुटुंब म्हणजे भाऊ, भावजय, दीर- वहिनी, आई-वडील असे एकत्र कुटुंब अपेक्षित असल्याचे काही जणांच्या (सगळ्यांच्या नाही) उत्तरावरून जाणवले. तुमचे एकत्र कुटुंब आहे का, या प्रश्नावर मुलाने आणि सुनेने ‘हो. आम्ही आई-वडिलांसोबत (सासू-सासरे) एकत्र राहतो’ असे सांगितले, तर त्यांच्याच घरातील ज्येष्ठ पिढीतील सदस्यांनी ‘नाही’ असे उत्तर देताना ते एका मुलाबरोबर आणि सुनेसोबत राहतात, पण त्यांचा दुसरा मुलगा दुसऱ्या घरात राहत असल्याने आमचे एकत्र कुटुंब नाही, असे सांगितले. प्रश्नावलीत म्हणूनच तुमचे आणि मुलाचे/ मुलीचे एकत्र कुटुंब आहे का, असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर ज्येष्ठ पिढीकडून ६१ टक्के उत्तरे नकारार्थी आली. केवळ ३९ टक्के व्यक्तींनी मुलगा अथवा मुलीसोबत एका घरात राहत असल्याचे सांगितले. तरुण पिढीपैकी ६२ टक्के व्यक्ती स्वतंत्र राहतात. आईवडिलांसोबत राहणाऱ्या उरलेल्या ३७ टक्के व्यक्तींपैकी जवळपास निम्म्या व्यक्ती स्वतच्या नावावर असलेल्या घरात राहतात, तर तेवढय़ाच व्यक्ती आईवडिलांच्या घरात राहतात. उरलेल्यांनी (११ टक्के) घर संयुक्त नावावर असल्याचे सांगितले. एकत्र कुटुंबात राहणाऱ्या तरुण पिढीत 19-lp-diwali-2016ज्यांनी स्थलांतर केले आहे ते स्वतच्या घरातच आई-वडिलांसोबत राहताहेत. आई किंवा वडिलांच्या नावावर असलेल्या घरात राहणाऱ्या तरुण पिढीपैकी बहुतेकांनी स्थलांतर केलेले नाही.

इच्छा एकत्र राहण्याची पण…

स्वतंत्र राहतो म्हणणारी तरुण पिढी – काय करणार राहावं लागतं- अशा नाइलाजाच्या सुरात हे सांगते. तरुण पिढीतील ४१ टक्के व्यक्ती स्वतंत्र राहण्याला प्राधान्य देतात. उरलेले संधी मिळाली तर पालकांसोबत एकत्र राहायला आवडेल, असे सांगतात. यामध्येही थोडी गंमत आहे. तरुण पिढीतील स्त्रिया आई-वडील आणि सासू-सासरे यांच्यासोबत एकत्र राहायला आवडेल असे सांगतात. तरुण पिढीतील पुरुषही हा पर्याय निवडतात. केवळ माझ्या आई-वडिलांसोबत राहायला आवडेल असे म्हणणाऱ्या पुरुषांची संख्या अगदी हातावर मोजण्याएवढी आहे. यावरून पत्नीच्या पालकांसोबत एकत्र राहण्याची मानसिकता (कल्पनेत तरी) तयार झाली आहे, असे म्हणता येईल.

स्वतंत्रपणे राहणारी ज्येष्ठांची पिढी प्रगतीसाठी मुला-मुलीचे दूर जाणे समजू शकते. पण आदर्श कुटुंबव्यवस्था एकत्र कुटुंबाचीच असावी असे म्हणणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये अडचणी आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहेत, हे नमूद करताना जवळजवळ राहण्याचा पर्याय सर्वात चांगला असेही सुचवते. आदर्श व्यवस्था म्हणजे मुलगा-सून, मुली-जावई हाकेच्या अंतरावर असावेत, एका छताखाली नसले तरी चालेल इथपर्यंत गाडी येऊन पोचली आहे.

मुलांसाठी स्थलांतर

नोकरीनिमित्ताने स्थलांतर करणारे प्रत्येक पिढीत काही जण असतातच. या सर्वेक्षणात नोकरी- व्यवसायासाठी स्थलांतर केलेल्या तरुण पिढीतील प्रतिनिधींचे प्रमाण ८४ टक्के आहे. स्थलांतर केलेल्यांपैकी ६५ टक्के व्यक्तींनी परदेशात स्थलांतर केलेले आहे. त्यांचे पालक त्यांच्याकडे येऊन-जाऊन असतात. म्हणजे सहा-सहा महिने राहणारे पालक आहेत आणि दोन वर्षांतून एकदा जाणारेही आहेत. नातवंडे झाली की मगच जाणार, असे सांगणारे पालकही आढळले. स्वत:च्या किंवा जोडीदाराच्या नोकरी- व्यवसायासाठी स्थलांतर केलेल्या मागच्या पिढीतील ३४ टक्के व्यक्ती आहेत. मुलाच्या किंवा मुलीच्या नोकरीनिमित्ताने स्थलांतर करावे लागलेल्यांचे प्रमाण मात्र ४९ टक्के आहे.

पूर्वी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या नोकऱ्या किंवा व्यवसाय आजच्या तुलनेत कमी होते. त्यामुळे मागच्या पिढीतील अनेकांनी स्वत:च्या कारकीर्दीत एकाच शहरात राहून नोकरी केलेली आहे. तरुण पिढीसाठी नोकरीच्या संधी अधिक आहेत आणि जगभर कुठेही त्या असू 20-lp-diwali-2016शकतात, याची जाणीव त्यांना आहे. त्यातून स्थलांतर वाढीस लागले आहे. पण ज्या पिढीने नोकरीसाठी स्थलांतर केले नाही, ते मुलांची सोय किंवा अन्य कारणाने मुलांसोबत स्थलांतर करताना दिसत आहेत.

मुलांसाठी कराव्या लागणाऱ्या स्थलांतराचा कालावधी फार नाही. मुलांची सोय बघून, त्यांना मदत म्हणून आणि मुख्य म्हणजे नातवंडांचा सांभाळ करण्यासाठी आणि त्यांच्या ओढीने स्थलांतर करणारे पालक मोठय़ा प्रमाणावर आहेत. पण ते वर्षांतून काही काळासाठीच मुलांकडे जातात. नियमितपणे चार-सहा महिन्यांसाठी स्थलांतर केलेल्या ज्येष्ठांचे प्रमाण २२ टक्के आहे. सहा महिने ते एक वर्ष या कालावधीसाठी स्थलांतर करणाऱ्यांचे प्रमाण १२ टक्के आहे. देशांतर्गत विशेषत: राज्यांतर्गत स्थलांतर केलेल्यांनी मात्र ते कायमसाठी केले आहे. मुलगा पुण्या-मुंबईसारख्या शहरात स्थलांतरित झाला असेल तर त्याच्याबरोबर कायमचे स्थलांतरित झालेले पालक जास्त आहेत. मुलांसाठी स्थलांतर किती काळ योग्य वाटते याविषयी चर्चा करताना पालकांनी वेगवेगळे मुद्दे मांडले. परदेशात कायमचे स्थलांतर नको हा त्यातला प्रमुख आणि सामायिक मुद्दा होता. काही महिने ठीक आहे, पण वेळ आलीच तर मुलांबरोबर राहण्यासाठी परदेशात जाऊ असे म्हणणारेही होते. ‘स्थलांतरासाठी कोणतीही अट नसल्याने मुलींनी त्यांच्या सोयीने ठरवावे’, असे एक जण म्हणाले. ‘आमचे स्वत:चे असे इथे विश्व तयार झाले आहे. आमची सांस्कृतिक गरज परदेशात भागू शकणार नाही,’ हे कारण स्थलांतराच्या कमी कालावधीसाठी दिले गेले. स्वातंत्र्य, स्वत:ची स्पेस या कारणासाठीदेखील कायमचे मुलांच्या गावी जाण्यास ज्येष्ठ मंडळी तयार नाहीत. ‘नातवंडे सुटसुटीत होईपर्यंत जाऊ आणि मग मात्र मूळ ठिकाणी यायला आवडेल. आपलंही स्वातंत्र्य राखणं आवश्यक आहे,’ असे एकाने सांगितले. स्थलांतरित शहरातील भाषा, संस्कृती, जीवनशैली याचा स्थलांतराच्या वेळी विचार होतो. पण मुलांच्या गरजेपुढे आमच्या अटी मागे ठेवाव्या लागतात, असा सूर दिसला.

स्थलांतराचा प्राधान्यक्रम

पालकांसाठी स्थलांतराचा प्राधान्यक्रम मुलांची सोय आणि म्हातारपणाचा आधार हाच होता. स्थलांतराचा निर्णय घेतानाच्या प्राधान्यक्रमाविषयी नोकरी- व्यवसायातील प्रगतीची संधी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे असे सर्वाधिक तरुणांनी सांगितले. २७ टक्के व्यक्तींनी स्थलांतरासाठी चांगली संधी हाच प्राधान्यक्रम आघाडीचा असल्याचे सांगितले, तर २३ टक्के व्यक्तींनी जोडीदाराच्या दृष्टीने 21-lp-diwali-2016सोयीची नोकरी प्राधान्याने विचारात घेतो असे सांगितले. जोडीदाराच्या दृष्टीने सोयीची नोकरी हा दोन क्रमांकाचा प्राधान्यक्रम असल्याचे दिसले. त्यानंतर मुलांचे भवितव्य, शाळा, इतर सुविधा यांचा विचार तरुण पिढी करत असल्याचे दिसते आहे. यानंतरचा प्राधान्यक्रम पालकांची व्यवस्था याला होता. (असे असले तरी १३ टक्के व्यक्तींनी मुलांचे भवितव्य हा क्रमांक एकचा प्राधान्यक्रम दिला तर नऊ जणांनी पालकांची व्यवस्था हा प्रथम क्रमांकाचा प्राधान्यक्रम सांगितला.) वेळेच्या दृष्टीने सोय, स्थलांतरित शहरातील भाषा, जीवनशैली, संस्कृती याचा विचार त्यानंतर करत असल्याची उत्तरे मिळाली. सर्वेक्षणामधील स्थलांतरित कुटुंबात पती-पत्नी दोघेही नोकरी करणारे असतातच असे नाही. त्यामुळे जोडीदाराची नोकरी हा प्राधान्यक्रम आणि नोकरी-व्यवसायातील प्रगतीची संधी हा प्राधान्यक्रम एकाच नाण्याच्या बाजू आहेत, हे येथे नमूद करावेसे वाटते. नोकरी-व्यवसायातील संधीसाठी स्थलांतराचा विचार करताना प्रथम मुलांचा आणि नंतर पालकांचा विचार तरुण पिढी करते, असे यावरून म्हणता येईल. अधिक प्रगतीची संधी असेल तर सध्याचे घर, शहर सोडून स्थलांतर करायची तयारी आहे असे तरुण पिढीपैकी ८५ टक्के व्यक्तींनी सांगितले. १६ टक्के लोकांनी स्थलांतराला आता तयार नसल्याचे म्हटले. नोकरी व्यवसायाच्या शहरात पालकांनीही आपल्याबरोबर यावे असे २५ टक्के मुलांना वाटते. १४ टक्के मुलांना पालकांनी बरोबर यायची गरज वाटत नाही तर सर्वाधिक ६१ टक्के तरुण पिढी म्हणते की, पालकांची इच्छा असल्यास त्यांनी यावे.

पालकांची इच्छा असेल तर यावे म्हणणाऱ्या तरुणांना यातील अडचणींविषयी विचारले असता, पालकांना या वयात नवीन ठिकाणी जुळवून घेणे अवघड जाईल, असे वाटत असल्याचे सांगितले. परदेशस्थ कुटुंबातील तरुणांनी व्हिसा नियम आणि इतर सोपस्कार यामुळे पालकांचे कायमचे स्थलांतर शक्य नाही, असेही स्पष्ट केले.

याचा अर्थ ७५ टक्के तरुण पिढीला पालकांबरोबर स्थलांतर फार सोयीचे वाटत नाही. त्यात अडचणी येऊ शकतात, हे त्यांना मान्य आहे. पण त्याच वेळी एकत्र कुटुंबात आई-वडिलांसह राहायला त्यांना आवडेल, असेही ते म्हणतात. नोकरी-व्यवसायात प्रगतीची संधी असेल तर स्थलांतर करणे आवश्यकही वाटत असते. म्हणजे स्थलांतर आणि पालकांची व्यवस्था यांच्या संबंधाचा विचार तरुण पिढी करते, पण या 22-lp-diwali-2016प्रश्नाकडे रॅशनली बघण्याची, यावर उपाय शोधण्याची किंवा मानसिकता बदलण्याची दृष्टी अजून त्यांनी पुरती कमावलेली नाही, असे म्हणायला वाव आहे.

एकत्र कुटुंबात राहण्यातील अडथळे मान्य करतानाही हे व्यावहारिक मुद्दे सोयीस्कर विसरून कौटुंबिक  जिव्हाळा, संस्कार, प्रेम, एकमेकांचा आदर वगैरे शब्दांमध्ये घोटाळत एकत्र कुटुंबात राहण्याची इच्छा ते व्यक्त करतात.

विस्तारित एकत्र कुटुंबाचा पर्याय

म्हातारपणची काठी मानण्यात मुलगा आणि मुलगी असा भेद केला जात नाही, हे तर या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. मुलींचे पालकदेखील उतारवयातील आधार म्हणून मुलींकडे बघतात आणि एकुलत्या एका अपत्याकडे ओघानेच पालकांची जबाबदारी येते. हल्लीच्या अशा छोटय़ा कुटुंबांमध्ये एकुलत्या एका मुलाने आणि मुलीने पालकांसोबत एकत्र राहण्याचा विचार केल्यास किमान आई-वडील, मुलगा किंवा मुलगी आणि सून किंवा जावई याबरोबर सून/ जावयाचे आई-वडील असे किमान सहा जणांचे कुटुंब होईल. ही रचना योग्य वाटते का यावर अनेकांनी प्रथमदर्शनी अशा कुटुंबरचनेची कल्पना चांगली असल्याचे मान्य केले. ती प्रत्यक्षात येऊ शकते असे सांगताना त्यामध्ये व्यावहारिक अडचणी असतील हेदेखील कबूल केले. या रचनेत पर्सनल स्पेस मिळेल का, कुटुंबप्रमुख कोण असेल, घर कुणाच्या मालकीचे असेल आणि पालकांचे काँट्रिब्युशन काय अपेक्षित आहे, असे विचारल्यानंतर एकेक अडचण समोर यायला लागली. ‘एका म्यानात दोन तलवारी राहू शकत 23-lp-diwali-2016नाहीत.’ ‘आमच्यापेक्षा पालकांनाच एकमेकांशी जुळवून घेणे अवघड जाईल’, अशी उत्तरे तरुण पिढीकडून मिळाली. ‘एकत्र कुटुंबात एका वेळी नवरा- बायकोपैकी कुणा एकाचेच पालक राहू शकतात’, असेही एकाने सांगितले. पण रचना म्हणून ही आदर्श असल्याचे बहुतांशी तरुण पिढीला वाटत आहे.

आधीच्या पिढीपुढे हा किमान सहा जणांच्या कुटुंबाचा प्रस्ताव ठेवला असता, त्यांनी हे प्रत्यक्षात येणे कठीण असल्याचे लगोलग मान्य केले. यापेक्षा स्वतंत्र कुटुंबच बरे याबाबत ज्येष्ठ पिढीकडे पुरेशी सुस्पष्टता दिसली. एकमेकांच्या घराशेजारी स्वतंत्र राहण्याचा पर्याय त्यांना जास्त भावतो. ही एका छताखालील विस्तारित कुटुंबाची रचना योग्य नसल्याचे अनेकांनी सांगितले. अशी रचना झालीच तर घर तरुण दाम्पत्याच्या नावावर असावे हेदेखील लगेच स्पष्ट केले. एकमेकांच्या स्पेसचा आदर करून सामंजस्याने राहिले तर ही रचना यशस्वी होईल, असे वाटत असल्याचे मत काही ज्येष्ठांनी व्यक्त केले.

पर्सनल स्पेसबाबत गोंधळ

एकत्र कुटुंबात पर्सनल स्पेस मिळते का याविषयीच्या चर्चेदरम्यान खूप वेगवेगळी उत्तरे आली. पर्सनल स्पेस या संकल्पनेची व्याख्या प्रत्येकाच्या लेखी निरनिराळी आहे, हेदेखील त्यातून स्पष्ट झाले. सर्वसाधारणपणे तरुण पिढी पर्सनल स्पेसचा विचार करताना घराचा आकार विचारात घेते. मोठे घर आणि स्वतंत्र खोल्या असतील तर एकत्र कुटुंबातही पर्सनल स्पेस मिळू शकते, असे तरुणांचे म्हणणे आहे.  ‘सलग ४८ तास घरात नवरा-बायकोला डिस्टर्बन्स न येता वावरता येते, त्या घरात पर्सनल स्पेस मिळते असे म्हणायचे’ अशी व्याख्या एका तरुणाने मांडली. आपली मते मांडता येण्याचे स्वातंत्र्य म्हणजे पर्सनल स्पेस असे एक जण सांगतो. तर या पिढीची दुसरी व्यक्ती असेही 24-lp-diwali-2016म्हणते – ‘पर्सनल स्पेस म्हणजे आम्ही काय जेवतो, किती वेळा बाहेर खातो, वीकएण्डला फ्रेण्ड्ससोबत बाहेर जातो या सगळ्या गोष्टींमध्ये आपली मते सारखी सारखी देऊ नयेत.’

ज्येष्ठांमध्येही पर्सनल स्पेसच्या बाबतीत एकवाक्यता नाही. काही वयस्क दाम्पत्यांनी ‘आम्हाला हवे तेव्हा, हवे ते करता यायला हवे. व्यक्ती म्हणून माझे स्वतंत्र अस्तित्व मान्य असावे आणि कुणी गृहीत धरू नये,’ असे स्पष्टपणे सांगितले. तर बहुतांशी वयस्क व्यक्तींनी मात्र ‘उतारवयात पर्सनल स्पेस आवश्यक नसतेच. नातवंडांच्या सहवासापुढे अशा पर्सनल स्पेसची गरज वाटत नाही. मुलांना करता येईल तेवढी मदत करत आनंदात जगता आले की आणखी काही नको’ अशी मते व्यक्त केली. एकत्र कुटुंबात राहणाऱ्या तरुणांना पर्सनल स्पेस मिळते का, असे विचारल्यावर कधी तरी ती मिळेपर्यंत वाट बघावी लागते, असेही त्यांनी नमूद केले.

… की म्हातारपणची काठी?

आई-वडील ही सपोर्ट सिस्टीम वाटते की, आपण त्यांची म्हातारपणची काठी आहोत असे वाटते. या प्रश्नावर तरुण पिढीमध्ये ‘दोन्ही’ असे उत्तर देणाऱ्यांचे प्रमाण ८४ टक्के आहे. आधीच्या पिढीने मुलाला किंवा मुलीला म्हातारपणची काठी मानत असल्याचे मान्य केले. मुलीला म्हातारपणची काठी मानता का असा प्रश्न मुद्दाम स्वतंत्रपणे विचारण्यात आल्यावरदेखील याबाबतीत मुलगा-मुलगी भेदभाव दिसला नाही. त्याच वेळी ‘आम्हाला दोन मुलीच असल्यामुळे आमच्या उतारवयातील सोय आम्ही योजून ठेवली आहे’, असे म्हणणारेही पालक होते. मुलीसाठी स्थलांतर केलेली दोन कुटुंबे सर्वेक्षणात समाविष्ट होती. आम्ही वृद्धांकडे आमची सपोर्ट सिस्टीम म्हणून बघतो, आम्हाला आवश्यक असणारा भावनिक आधारही त्यांच्याकडून मिळतो, असेही एकत्र कुटुंबात राहणाऱ्या तरुणांना वाटते. सपोर्ट सिस्टीमवर चर्चा करताना मुलगा ही म्हातारपणची काठी असे म्हणत असले तरी, आधीच्या पिढीने उतारवयातील सोय म्हणून आर्थिक तरतूद केली आहे, हे आवर्जून सांगितले. आम्ही आर्थिक बाबतीत मुलांवर अवलंबून नाही, मात्र शरीर थकल्यावर कदाचित मुलांचा भावनिक आधार लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. समांतर सपोर्ट सिस्टीम म्हणून चांगल्या सुविधांचा वृद्धाश्रम हाही पर्याय काहींनी सांगितला. पण नाइलाज झाला तरच वृद्धाश्रमाची वाट धरणार असल्याचे त्यांचे स्पष्ट मत आहे. वृद्धाश्रमांचे सध्याचे स्वरूप, तिथली व्यवस्था, स्वच्छता याकडे बघता वृद्धाश्रमाचा पर्याय नको वाटतो, असे एका ज्येष्ठाने सांगितले.

आदर्शवादात अडकलेल्या पिढय़ा

या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांप्रत येताना, यातून दोन पिढय़ांच्या मानसिकतेचा शोध घेता आला असे म्हणावे लागेल. कुठल्याही आकडेवारीत न अडकताही भविष्यातील कुटुंबसंस्थेचा विचार अद्यापि पुरता झालेला नाही, हे या सर्वेक्षणादरम्यान झालेल्या चर्चेतून पुरेसे स्पष्ट होते. या दोन्ही पिढय़ांवर आदर्शवादी भारतीय कुटुंबव्यवस्थेचे संस्कार झाल्यामुळे आदर्शवादात अडकलेली मानसिकता त्यांना भविष्याचा व्यावहारिक दृष्टीने विचार करू देत नाही. त्याच वेळी हेदेखील स्पष्ट होते की, आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण असूनही त्यांची एकमेकांमध्ये भावनिक गुंतवणूक मोठी आहे आणि याच कारणासाठी ते मुला-बाळांच्या जवळ कायम राहू इच्छितात. स्वतंत्र राहून किंवा दूर राहूनही एकमेकांमध्ये असलेली भावनिक गुंतवणूक अजिबात कमी झालेली नाही. हीच गुंतवणूक एकत्र कुटुंबव्यवस्थेकडे असलेला कल स्पष्ट करते.

जागतिकीकरणाच्या लाटेनंतर आता आपल्याकडे पाश्चिमात्य विचारांचा पगडा वाढणार आणि आपली कुटुंबव्यवस्थाही त्यांच्या वळणावर जाणार, असे सरसकट म्हटले जात होते. पण अजूनही भारतीय कुटुंबसंस्था तिचे अस्तित्व आणि गुंतवणूक टिकवून आहे, हे यातून स्पष्ट होते. जागतिकीकरणाला सुरुवात झाल्याच्या २५ वर्षांनंतर आपण हे म्हणतो आहोत, हे महत्त्वाचे.

या सर्वेक्षणात हाती लागलेला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याकडे उतारवयातील काळजी घेणारे सक्षम पर्याय उपलब्ध नाहीत यावर दोन्ही पिढय़ांकडून बोट ठेवण्यात आले. त्याच वेळी वृद्धाश्रमांविषयीची अनास्था स्पष्ट झाली. वृद्धाश्रम या शब्दाला असलेली नकारात्मक किनार अनेकांना जाचते आहे, हेदेखील उघड झाले. अगदीच वेळ आली तर किंवा शेवटचा पर्याय, नाइलाज म्हणून वृद्धाश्रमाकडे पाहिले जाते आहे. याला कारण आजच्या वृद्धाश्रमांची व्यवस्था, अवस्था, त्याविषयीचे ग्रह हे आहे.

नोकरी करणारी, स्थलांतर करणारी तरुण पिढी संपत्तीनिर्मितीच्या मागे आहे हे खरे. पण त्यांच्याही मनात वृद्धाश्रमाबद्दल फार सकारात्मक विचार नाहीत. मुलगा आपल्याजवळ राहील याची त्यांना खात्री नाही, त्यांची तशी अपेक्षाही नाही. पण तरीही अपत्य असणारी तरुण दाम्पत्ये उतारवयात स्वतंत्र राहू आणि शरीराने साथ सोडल्यावर मुला-मुलीजवळ राहू असे म्हणतात. आश्चर्य म्हणजे २० टक्केतरुणांनी उतारवयातील आदर्श सपोर्ट सिस्टीम कशी असावी याचा विचार केलेला नाही.

एकत्र कुटुंबपद्धतीला पर्याय काय याविषयी मुलांबरोबर चर्चा करताना – पर्यायी सपोर्ट सिस्टीमबाबत ज्येष्ठांची पिढी विचारपूर्वक व्यक्त झाली. मुला- मुलीच्या घराशेजारी घर घेऊन स्वतंत्रपणे राहणे हा पर्याय बहुतेकांना पसंतीचा वाटतो. पण हे करताना आर्थिक गणिते जुळली पाहिजेत, हेदेखील त्यांना समजते. समवयस्कांच्या, मित्रमंडळींच्या सान्निध्यातील शेवटचे दिवस सर्वाना हवे आहेत. या पर्यायी सपोर्ट सिस्टीममधील अडचणी काय, याविषयी सविस्तर बोलताना अनेक जण अंतर्मुख झाले आणि स्वत:च्या मानसिकतेकडे त्यांनी बोट दाखविले. मुलांची मानसिकता, सोयी-सुविधांचा अभाव, आर्थिक गणिते, सामाजिक दबाव यादेखील अडचणी म्हणून सांगण्यात आल्या.

वृद्धांना स्वयंपूर्णतेने जगण्यास मदत करणारी वयोवृद्धांची वसाहत ही पर्यायी व्यवस्था भविष्यकाळात सोयीची असेल असे बहुतेकांनी सांगितले. समवयस्कांची सोबत आणि मुलांची नियमित भेट या दोनच अपेक्षा असल्याचे दोन्ही पिढय़ांनी मान्य केले. पण अशी पर्यायी व्यवस्था आपल्या समाजात अद्याप पुरेशा प्रमाणात निर्माण झालेली नाही. एकटय़ा वृद्धांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होणार आहे आणि त्याचा सामना करण्यासाठी पर्यायी सोय किंवा व्यवस्था एका दिवसात निर्माण होऊ शकत नाही. ती प्रत्यक्षात आणण्याइतकीच मानसिकता बदलण्याचीही निकड आहे, हे या अभ्यासातून दिसते. बदलत्या कुटुंबाची बदलती गोष्ट मानसिकता बदलल्याखेरीज सुफळ संपूर्ण होणे नाही.

सर्वेक्षण कशासाठी ?

नातेसंबंध, कुटुंबव्यवस्था, विवाहसंस्था हे सातत्याने चर्चिले जाणारे विषय. समाजव्यवस्थेच्या बदलाचे द्योतक म्हणावे असेच. अर्थातच त्याचे प्रतिबिंब सर्वप्रकारच्या माध्यमांमध्ये दिसले नाही तर नवलच. पण केवळ बदल टिपण्यावरच थांबून चालत नाही. त्या बदलातून येणाऱ्या भविष्यावर भाष्य करणे अभिप्रेत असते.

‘लोकप्रभा’ने यापूर्वी दिवाळी अंकासाठी या बदलावर आणि भविष्यावर भाष्य करणारी दोन सर्वेक्षणं केली आहेत. समाजमाध्यमांच्या वाढत्या लोकप्रियतेचा आणि वापराचा मागोवा घेत आभासी जगातील वास्तवाचे भान आम्ही मांडले होते. तसेच नव्या पिढीचा विवाह संस्थेकडे पाहण्याचा बदलेले दृष्टिकोनही टिपताना स्वर्गात बांधल्या जाणाऱ्या गाठी आता जमिनीवर म्हणजेच वास्तवाच्या पातळीवर आल्याचे दाखवले होते. त्याच वाटेवर पुढे जात आज बदलत्या कुटुंबव्यवस्थेची बदलेली परिस्थिती मांडली आहे.

बदलती कुटुंबव्यवस्था हा विषय तसा नवीन नाही. नोकरी-व्यवसायासाठी खेडय़ातून शहराकडे, शहरातून मोठय़ा शहरांकडे आणि पुढे देशाबाहेर अशी स्थलांतराची प्रक्रिया आपल्याकडे दिसते. पण एका पिढीतील तरुणांचे अशा कारणांसाठी स्थलांतर होते तेव्हा त्यांचे वा तिचे पालकदेखील स्थलांतर करतात का? त्यातून कुटुंबव्यवस्थेत काही बदल होत आहेत का?

समाजात घडते तेच मनोरंजनाच्या माध्यमातून उलगडते असे म्हटले जाते. पण आज चित्रपट, मालिका अशा माध्यमातून मात्र चित्र वेगळेच दिसते. जे विकले जाते तेच दाखवले जाते हे जर खरे मानले तर आजही अनेकांच्या मनात आदर्श अशा एकत्र कुटुंब रचनेचे चित्रच दिसते. पण समाजातील आजची व्यवस्था खरेच तशी आहे का? समाजमाध्यमांवर त्याचे काही प्रतिबिंब उमटते का? एकीकडे वृद्धाश्रम बदनाम होत असताना खास वृद्धांसाठी विशेष सोयीसुविधा असणारे एक संकुल बांधले जात आहे.

याच अनुषंगाने बदलती कुटुंबव्यवस्था, एका छताखालच्या कुटुंबाची बदलती व्याख्या, ज्येष्ठांच्या सपोर्ट सिस्टीममध्ये होणारे बदल आणि आज जे तरुण आहेत त्यांच्या आयुष्यात २५-३० वर्षांनंतर कोणती सपोर्ट सिस्टिम अपेक्षित आहे, याचा वेध आम्ही घेतला आहे.

स्थलांतर केलेले आणि न केलेले

सर्वेक्षणात काही कुटुंबांशी चर्चा करताना काही पठडीबाहेरच्या गोष्टी जाणवल्या. मुलांच्या स्थलांतराबाबत शहरी पालक हे काहीसे सरावलेले आहेत. पण निमशहरी भागातदेखील याचा विचार साकल्याने होताना जाणवतोय. त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे दिगंबर आणि नीला फाटक यांचे स्थलांतर. एकाच छताखाली स्टेशनरीच्या जोडीने असंख्य वस्तू विकणारे आणि पंचक्रोशीत नावाजलेले जवळपास शंभर वर्षे जुने दुकान चक्क बंद करून, हे पालक मुलाजवळ किमान वर्षभरासाठी थेट म्यानमारमध्ये स्थलांतरित झाले आहेत. मुलाने पिढीजात व्यवसाय न सांभाळता मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ते कंट्री मॅनेजर अशी नोकरीतून स्वत:ची वाट शोधत आफ्रिका ते म्यानमार असा प्रवास केलाय. अर्थातच त्याला त्यातच गती आहे हे स्वीकारत स्वत:च्या मर्यादा ओळखून पालकांनी निर्णय घेणे हे बदलाचे द्योतकच म्हणावे लागेल. पण हे स्थलांतर कायमस्वरूपी होणे अवघडच असल्याचे त्यांच्याशी बोलण्यातून जाणवते. पण मग पुन्हा मूळ गावी जाणार असाल तर वृद्धापकाळच्या सपोर्ट सिस्टीमचे काय, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच असल्याचे मुलाच्या बोलण्यातून जाणवते. छोटय़ाशा गावात सारे एकमेकांना धरून असतात, मात्र तरीदेखील पालकांची काळजी घेणारी एखादी स्वतंत्र व्यवस्था असणे ही पुढील काळाची गरज मुलाच्या बोलण्यातून प्रकर्षांने जाणवत राहते.

दुसरे उदाहरण नम्रता म्हात्रे यांचे. मुलगा पुण्यात आणि मुलगी अमेरिकेत. मुलांना त्यांची स्पेस देत त्या वर्षांतून सहा महिन्यांसाठी स्थलांतर करतात. स्थलांतरासाठी प्रदेश, भाषा, हवामान अशा फारशा अटी न ठेवता त्या भटकत असतात. इतकेच नाही तर तेथील परिस्थितीनुसार स्वत:मध्ये बदल करून घेतात. थंड प्रदेशातील वातावरणानुसार अगदी साडीचा पारंपरिक पेहराव टाळून जीन्स, कुर्ता, ओव्हरकोट घालणंदेखील त्यांनी पसंत केलेय.

तिसरे उदाहरण नोकरीनिमित्ताने ऑस्ट्रेलियात कायमचे स्थलांतर केलेल्या अनिकेत चव्हाण (नाव बदलले आहे) यांचे. त्यांचे वडील जयराम चव्हाण हे स्वत:च नोकरीसाठी गावापासून ३६ वर्षे दूर होते. अर्थातच निवृत्तीनंतर स्वत:च्या गावी शेतीवाडीत त्यांचे मन रमताना दिसते. परिणामी काही काळ ऑस्ट्रेलियात वास्तव्य केल्यानंतर पुन्हा आपला गाव बरा अशी त्यांची मानसिकता दिसून येते. अर्थात मुलाच्या प्रगतीत अडथळा यावा आणि त्याने भारतात परतावे अशी त्यांची अपेक्षा नाही. मुलाने आई-वडिलांसोबत राहण्याचा प्रयत्न एक-दीड वर्षे केला पण, नव्या भाषेशी आणि संस्कृतीशी जुळवून घेणे आणि वातावरणातील बदल हे मोठे अडथळे जाणवले. पालकांना चार-पाच जणांचे कुटुंब योग्य वाटत असले तरी ते आजच्या युगात शक्य नसल्याची जाणीव आहे. मर्यादित गरजा असल्यामुळे आर्थिक विवंचना नाहीत पण सपोर्ट सिस्टीम म्हणून मुलांकडेच डोळे लागलेले आहेत.

म्हातारपणची शेवटची काठी

भारतीय कुटुंबव्यवस्था ही आदर्शवत कुटुंबसंस्था. एकत्रित, गुण्यागोविंदाने राहणारी कुटुंबे हे निश्चितच चांगले चित्र, स्वागतार्ह चित्र. आपल्या चित्रपट-मालिकांमधून नेहमी ‘हम साथ साथ है’चे असेच गुलाबी चित्र दाखवले जाते आणि ते सगळ्यांवरच भुरळ पाडते. पण याची शाश्वतता तपासायची वेळ आली आहे. कारण जागतिकीकरणाचे परिणाम आणि त्यामुळे बदललेले प्राधान्यक्रम. प्राधान्यक्रम बदलले असे म्हणतो, कारण संपत्तीनिर्मिती हा सर्वोच्च प्राधान्यक्रम झाला आहे. तो तसाच असला पाहिजे हे खरे, पण घरच्या जेवणापुढे थोडय़ा चांगल्या पगाराचे मोल ते काय.. किंवा एकत्र कुटुंबात राहणे महत्त्वाचे, बढतीसाठी गाव सोडून जायचे कशाला, हे म्हणणारी पिढी आता जुनी होत चालली आहे. मानसिकता बदलली आहे ती अशी. पण संपत्तीनिर्मितीत अडकलेल्या तरुण पिढीवर मुळात संस्कार असे झालेत ते पूर्वीच्या आदर्शाचे. त्यामुळे त्यांना एकत्र कुटुंबाची ओढ, पाश सोडवत नाहीत आणि नोकरीलाही नाही म्हणवत नाही. त्यामुळे स्थलांतर ही काळाची गरज वाटते. मुले ही म्हातारपणची काठी ही शिकवण लहानपणापासून मिळालेली. त्यामुळे आईवडील ही मुलांना सपोर्ट सिस्टीमपण वाटतात आणि जबाबदारीदेखील. पण हीच आजची तरुण पिढी आपल्या मुलांकडून ही जबाबदारीची अपेक्षा ठेवत नाही. म्हातारपणी स्वतंत्रपणे जगायचीच त्यांची इच्छा आहे. सपोर्ट सिस्टीम म्हणून वृद्धांसाठी बांधलेली वसाहत किंवा मुले आणि मित्रमंडळींच्या सान्निध्यातील घर हे दोन पर्याय त्यांना जवळचे वाटतात. आपले मूल मोठे झाल्यावर आपल्याबरोबर एकाच घरात राहील किंवा त्याने तसे राहावे असे त्यांना वाटत नाही. त्या अर्थाने आई-वडिलांसोबत एका घरात राहणारी ही पिढी कदाचित शेवटची असू शकते.

एकुलत्या एका मुलीच्या पालकांचा प्रश्न

सर्वेक्षणातील एकुलत्या एका मुलीच्या पालकांची उत्तरे मुद्दाम पुन्हा तपासली आणि त्याबरोबरच कुटुंबातील तरुण पिढीतील पत्नीची भूमिका लक्षात घेतली. एकुलती एक असेल तर पालकांची जबाबदारी मुलीने उचलायलाच हवी, याबाबत एकवाक्यता आढळली. उतारवयातील आधार- यामध्ये मुलगा-मुलगी भेद नाही, हे एक सकारात्मक चित्र यात दिसले. पण त्याच वेळी एकुलती एक मुलगी किंवा फक्त मुलीच असणाऱ्या पालकांसाठी हा पर्याय असल्याचे दिसले. विस्तारित एकत्र कुटुंबाचा पुरस्कार करणारी कुटुंबेदेखील अजूनही पत्नीचे आई-वडील ही तिच्या भावाची जबाबदारी मानतात. एकत्र कुटुंबातदेखील एकुलत्या एका मुलीच्या किंवा दोन मुलीच असलेल्या पालकांची जबाबदारी घेताना दिसतात, पण मुलगा असेल तर मात्र आपसूकच ही जबाबदारी त्याच्या खांद्यावर टाकलेली दिसते.

सासू-सासऱ्यांसोबत राहणारी तरुण स्त्रीसुद्धा भाऊ असेल तर आई-वडील त्याच्याकडे राहणार हे गृहीत धरते. आई-वडिलांना ती आपली जबाबदारी मानते, पण आपल्या घरातच ते राहावेत याबाबत ती आग्रही नाही. एकत्र कुटुंबात सासरी राहणाऱ्या मुलीच्या पालकांना स्थान देताना अजूनही ती एकुलती एक असेल तरच विचार होतो, अगदी कल्पनेतील एकत्र कुटुंबातदेखील मुलीच्या पालकांना (तिला भाऊ असेल तर) स्थान दिले जात नाही. मानसिकता बदलते आहे पण पुरती बदललेली नाही, हे यातून दिसते.

सामूहिक चौकटीला प्राधान्य

कुटुंबव्यवस्थेत बदल होत आहे, अधिकाधिक कुटुंबं छोटी आणि विभक्त होत आहेत, तरुण पिढी जास्तीत जास्त विभक्त आणि स्वतंत्र होत आहे, मात्र त्यांचे पालक आधाराची वाट पाहत आहेत असे एकंदरीत चित्र या सर्वेक्षणातून दिसून येते.

साधारण १९५६ पासूनच आपल्याकडे नोकरी-व्यवसायानिमित्ताने स्थलांतराची सुरुवात झाली आहे. २००० पर्यंत स्थलांतरित होणारी कुटुंबं आपल्या गावांशी संबंध ठेवून असायची. त्यादृष्टीने विभक्त कुटुंबपद्धतीकडे पाहताना काही गोष्टी नमूद कराव्या लागतील. आपली विभक्त कुटुंबपद्धती आणि पाश्चात्त्यांची कुटुंबपद्धती यामध्ये बराच फरक आहे. आपल्याकडील छोटी कुटुंबं ही प्रत्यक्षात वेगळी असली तरी मानसिकदृष्टय़ा, आर्थिक आणि धार्मिक बाबतीत एकमेकांशी जोडलेली असतात. स्थलांतरीत कुटुंबांचे विस्तारित क्षेत्र हा घटक महत्त्वाचा असतो.

आपल्या कुटुंबव्यवस्थेत काही बदल हळूहळू होत आहेत. तरीदेखील किमान दोन पिढय़ा एकमेकांशी जोडलेल्या असतात. पण आज आपली व्यवस्था ही पूर्णत: विभक्त आहे असे म्हणता येणार नाही.

आज आपल्या समाजात सर्वाधिक बदल दिसून येतोय तो म्हणजे ज्येष्ठांना स्वतंत्र राहायचं आहे. मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीयांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. छोटय़ा शहरातील पालक वेगळे राहताना दिसत आहेत. हा बदल मुख्यत: आर्थिक सुबत्तेमुळे आला आहे. पण तरीदेखील ते एकमेकांशी जोडलेले असतात.

आपल्या कुटुंबव्यवस्थेकडे पाहिले असता लक्षात येते की त्याला एक मूल्यांची चौकट आहे. आपली कुटुंबव्यवस्था समूहाने राहणारी, एकमेकाशी बांधलेली आहे, तर पाश्चात्त्यांची वैयक्तिकतेकडे झुकणारी आहे. आपल्याकडे साधारण मागील दशकापासून बदल दिसून येत आहे. पूर्वी मुलांनी विभक्त राहणे हे नकारार्थी समजले जायचे. पण आज त्याकडे तसे पाहिले जात नाही. माझी स्पेस, माझी आवड हे आता भारतीय कुटुंबरचनेतदेखील दिसून येते. आर्थिक सुबत्ता हा घटक त्यासाठी महत्त्वाचा वाटतो. मात्र अशा व्यवस्थेत गरजेचा असणारा मानसिक आधार हरवून जातो. अशा वैयक्तिक रचनेत अडीअडचणींच्या प्रसंगी संस्थात्मक आधार हवा असतो. तसा संस्थात्मक आधार आपल्या देशात अजून विकसित झालेला नाही. आपल्याकडे आजही अशा अडीअडचणींच्या वेळी नातेवाईक, जाती-समाजातील लोकांचा आधार घेतला जातो. एकटय़ाने राहणाऱ्या वृद्धांसाठी वैयक्तिक आधार देणाऱ्या सुविधा काही ठिकाणी सुरू झाल्या. पण त्याला संस्थात्मक आधार नाही. असे व्यक्तिकेंद्रित होणे योग्य नाही. पाश्चांत्त्यांमध्येदेखील आता पुन्हा एकमेकांशी जोडले जाण्याची प्रक्रिया जोर धरत आहे. आज स्थलांतरित कुटुंबाची संख्या तशी मर्यादित आहे. पण त्यामध्येदेखील बहुतांश ज्येष्ठ एकटे राहिल्यानंतरदेखील पुन्हा आपल्या मुलाकडे अथवा मुलीकडे परत जाताना दिसतात. बडोदा आणि आंध्र प्रदेशमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून आम्हाला हे जाणवले आहे.

या सर्वाच्या पाश्र्वभूमीवर २५ वर्षांनंतर काय या प्रश्नाचे उत्तर म्हणजे परदेशात कायमचे स्थलांतर झालेली कुटुंबं ही त्या त्या देशातील ज्येष्ठांच्या सोयी-सुविधांवर अवलंबून असतील. ते स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करतील पण पुढे जाऊन ते परत येतील. पालकांना गरजेच्या प्रसंगी मुलांचाच आधार असेल. काही प्रमाणात मुलीदेखील आज पालकांची काळजी घेताना दिसत आहे. एकंदरीत आजच्या रचनेनुसार पाहिले असता एकएकटा सुटासुटा विचार करण्यापेक्षा सामूहिक चौकटच चांगली आहे.

– प्रो. देवी प्रसाद, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स.

कुटुंबविस्तार आणि स्थलांतर

स्थलांतराचा आणि कुटुंबविस्ताराचा संबंध आहे का, या प्रश्नावर प्रथमदर्शी तरुण पिढीतील बहुतेकांनी असा संबंध ठेवला नाही, असे उत्तर दिले. वेळेवर मूल होणे आवश्यक आहे, हे कारणही त्यापुढे दिले. पण त्याच वेळी मूल होऊ देणे- न देणे हा महत्त्वाचा निर्णय होता, हे त्यांना मान्य आहे. २० टक्के तरुण व्यक्तींनी मूल होण्याचा निर्णय स्थलांतरामुळे पुढे ढकलला असे सांगितले. स्थलांतराच्या प्राधान्यक्रमामध्ये मुलांचे भवितव्य हा नोकरी-व्यवसायातील प्रगतीच्या संधीनंतर येणारा महत्त्वाचा मुद्दा दिसला. याचा अर्थ कुटुंबविस्ताराचा निर्णय स्थलांतराच्या निर्णयावर परिणाम करणारा किंवा स्थलांतराचा कालावधी कुटुंबविस्तार आणि त्यांच्या भवितव्यावर परिणाम करणारा आहे, असे म्हणायला वाव आहे. परदेशस्थ कुटुंबीयांना हे अधिक प्रमाणात लागू होते. कारण व्हिसाचा प्रकार, जोडीदाराची नोकरीची संधी, अपत्याचे नागरिकत्व, त्याचे शिक्षण या सगळ्यांचा त्यांना विचार करावा लागतो.

समजून घ्यायचं म्हणजे नेमके काय?

एकत्र कुटुंबपद्धत योग्य, असे म्हणणारे पालक आणि त्यांची मुले एकमेकांना समजून घ्यायला हवे अशी अपेक्षा व्यक्त करतात. पण समजून घेणे म्हणजे नेमके काय याविषयी तरुण मंडळी सविस्तर बोलत नाहीत. भारतीय एकत्र कुटुंब व्यवस्था ही आदर्श असल्याचे सांगताना यातील अडीअडचणींकडे सोयीस्कर कानाडोळा करण्याकडे तरुणाईचा कल दिसला. ‘पर्सनल स्पेस’च्या त्यांच्या व्याख्येत ते बरेच काही बोलून जातात, पण पालकांकडून काय अपेक्षा या प्रश्नावर बहुतेक जण समजून घ्यावे किंवा काहीच नाही अशी दोनच उत्तरे देतात. मुलांनी आम्हाला विचारावे, आम्हाला गृहीत धरू नये ही पालकांची अपेक्षा आहे. आदर्श सपोर्ट सिस्टीमबाबत बोलताना बहुतेकांनी एकत्र कुटुंबाचा पर्याय चांगला असल्याचे नमूद केले, पण मुलाबरोबर आठ वर्षे त्याच्या नोकरीच्या ठिकाणी स्थलांतरित झालेले पालकदेखील वेळ आल्यास आमच्या मूळ गावी परतू, तशी सोय केली आहे असे म्हणतात.
अरुंधती जोशी – response.lokprabha@expressindia.com, @aru001