दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या मराठवाड्याला अखेर दिलासा मिळाला मिळाला आहे. लातूरची तहान भागवणा-या मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहे. या धरणातून आता १४७ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु असून या पार्श्वभूमीवर नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्येही पावसाच्या हजेरीमुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाडा म्हणजे दुष्काळ असे दुर्दैवी समीकरणच गेल्या काही वर्षात तयार झाले. यावर्षी या भागाला चक्क रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला इतकी भीषण परिस्थिती होती. पण गेल्या १० दिवसात या भागाला पावसाने झोडपले असून अवघ्या १० दिवसात मराठवाड्यातील जलसाठ्यात भरमसाठ वाढ झाली आहे. पावसामुळे बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत आठ जणांचा बळी गेला असून काही ठिकाणी एनडीआरएफच्या पथकांना मदतकार्यासाठी पाचारण करावे लागले आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधील लहान आणि मध्यम धरण ओसंडून वाहूल गालेत. तर मोठे धरण संपूर्ण भरलेत किंवा त्यामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. बीडमधील बिंदुसारा हे सर्वात मोठे धरण तब्बल १० वर्षांनी भरले आहे. तर रविवारी माजलगाव धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. चार वर्षांनी हे धरण पूर्णपणे भरले आहे. सोमवारी पहाटे बीडमधील मांजरा हे धरणही ९० टक्क्यांपर्यंत भरल्याने धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहे. २०१० नंतर प्रथमच धरणाचे दरवाजे उघडावे लागलेत. वरुणराजाने कृपादृष्टी दाखवल्याने मराठवाड्यातील रहिवासी सुखावले आहेत. धरणातील पाणीसाठा बघण्यासाठी गर्दी होत असून अधिका-यांमध्येही आनंदाचे वातावरण पसरले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील १७ मध्यम आणि ९० छोटे धरण ओसंडून वाहू लागल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी दिली आहे. मुसळधार पावसामुळे उस्मानाबादमध्ये सहा गावांचा संपर्क तुटला तर दोन गावांमधील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले. मराठवाड्यात मुसळधार पाऊस सुरु असतानाच पालघर जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. सारणी उर्से रस्त्यावरील लहान पूल पाण्याखाली गेल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे.