स्वाइन फ्लूने राज्यभरात थैमान घातले आहे. १ जानेवारी ते २० एप्रिल या कालावधीत १३४ जणांचा मृ्त्यू झाला आहे. तर १९ जण व्हेंटिलेटरवर आहेत. ६८३ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात आतापर्यंत स्वाइन फ्लूने १३४ जणांचे बळी घेतले आहेत. तर १९ जण व्हेंटिलेटरवर आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये १६ जण हे मराठवाड्यातील आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्य सहायक संचालक नितीन बिलोलीकर यांनी दिली. औरंगाबादमध्ये आरोग्य विभागातर्फे स्वाइन फ्लूबाबत जागृतीसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य सहायक संचालक नितीन बिलोलीकर आणि राज्य सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी बिलोलीकर यांनी ही माहिती दिली. लोकांनी स्वाइन फ्लूने घाबरून जाण्याची गरज नाही. आरोग्य विभाग त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सक्षम आहे. टॅमीफ्लूच्या गोळ्या सर्व रुग्णालयांत उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचा दिलासा त्यांनी यावेळी दिला. तसेच ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान या आजाराचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.