सिंचन प्रकल्पांची उभारणी करताना कालव्यांच्या कामांकडे दुर्लक्ष झाल्याने पश्चिम विदर्भातील ३६ सिंचन प्रकल्प बांधकाम होऊनही अजून अपूर्णच आहेत. या प्रकल्पांचे कालवे तयार झाले असते, तर विभागात ३६ हजार हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता निर्माण होऊ शकली असती, हे वास्तव सिंचन विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. अमरावती विभागात एकूण १९१ प्रकल्प रखडलेले आहेत. ३६ प्रकल्पांची बांधकामे पूर्ण झाली आहेत, पण वितरिकांची कामे झालेली नाहीत. त्यामुळे सिंचन सुविधा उपलब्ध करून दिली जाऊ शकत नाही. ही कामे वेळेत झाली असती, तर शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहचू शकले असते. जलसंपदा विभागाच्या लेखी प्रकल्पांचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. पण, त्यातून सिंचन सुविधा निर्माण होऊ शकली नाही. वितरिकाच नसल्याचे शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. येत्या वर्षभरात कालवे पूर्ण करण्याचे नियोजन आहे, पण कामाची गती संथ असल्याचे चित्र आहे. अमरावती विभागातील उर्ध्व वर्धा, वान, अरुणावती, पेनटाकळी, बेंबळा, खडकपूर्णा या मोठय़ा सिंचन प्रकल्पांमधून सुमारे १ लाख ८६ हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. खडकपूर्णा, निम्न पेढी, निम्न पैनगंगा, जिगाव या प्रकल्पांचे काम सुरूच आहे. हे मोठे प्रकल्प पूर्ण झाल्यास अतिरिक्त ३ लाख ६५ हजार हेक्टरची सिंचन क्षमता निर्माण होऊ शकेल. विभागात एकूण १५ मध्यम प्रकल्पांचे काम सध्या सुरू आहे. त्यापैकी केवळ चंद्रभागा, पूर्णा, उतावळी आणि सपन या प्रकल्पांमधून सिंचन क्षमता निर्मिती झाली आहे. त्यापैकी काही प्रकल्पांच्या वितरिकांची कामे अर्धवट स्थितीतच आहेत. या सर्व मध्यमप्रकल्पांमधून आतापर्यंत २६ हजार ३६५ हेक्टरची सिंचन क्षमता निर्मिती झाली असून अजून ५६ हजार हेक्टरची सिंचन क्षमता निर्माण होऊ शकते. विभागात एकूण १८८ लघु प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांमधून आतापर्यंत केवळ ४७ हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास आणखी ९१ हजार हेक्टरची सिंचन क्षमता तयार होऊ शकते. पण, यातील अनेक प्रकल्पांची कामे रखडली आहेत. प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी अमरावती विभागात सहा मंडळ कार्यालये कार्यरत आहेत. अनेक पदे रिक्त आहेत. मनुष्यबळाअभावी कालव्यांची कामे रखडल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ज्या प्रकल्पांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, पण कालव्यांची कामे अपूर्ण आहेत, त्यात सर्वाधिक दहा प्रकल्प हे अमरावती जिल्ह्यातील आहेत. त्याखालोखाल यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्य़ातील प्रत्येकी ८, वाशीम ४ आणि अकोला जिल्ह्यातील २ प्रकल्पांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदी नदी, नागठाणा, झटामझरी, पाक नदी, चांदस वाठोडा, पूर्णा, चंद्रभागा, सपन, कावरा नाला, अकोला जिल्ह्य़ातील दगडपारवा, वान, वाशीम जिल्ह्यातील खडकी, कुतरडोह, बोरखेडी, अडाण, बुलढाणा जिल्ह्य़ातील तोरणा, कोराडी, ब्राम्हणवाडा, सायखेड, विद्रुपा, लोणवडी, यवतमाळ जिल्ह्य़ातील अंतरगाव, अरुणावती, बेंबळा, वाई, अमडापूर या प्रकल्पांची कामे अजूनही वितरिकांअभावी अपूर्ण आहेत.