रस्ते प्रकल्पासंदर्भात २०० कोटीपेक्षा कमी प्रस्ताव असेल तर त्यावर टोलनाका लावता येणार नाही, असे सांगून येत्या दोन महिन्यात ज्या कंत्राटदारांचे टोलनाक्यांचे करार संपणार आहेत, असे राज्यातील ४० टोलनाके येत्या दोन महिन्यात बंद करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकात पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
अ‍ॅग्रोव्हिजन प्रदर्शनाच्या समारोपाला आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. टोलनाक्यांसंदर्भात राज्य सरकार लवकरच नवीन धोरण करणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना टोलपासून मुक्ती मिळावी, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. टोल नाक्यासंदर्भात १०-१५ वर्षांंचे करार झाले असून त्यातील काही टोल नाक्यांची मुदत संपली आहे. त्यामुळे अशा कंत्राटदारांचा करार रद्द करून ते बंद करण्याचा विचार आहे. ज्या कंत्राटदारांसाठी जेवढा पैसा भरला असेल आणि त्याचा वसूल झाला असेल तर अशा कंत्राटदारांचे टोलनाक्यांचे कंत्राट रद्द करण्यात येईल. असे टोल नाके सुमारे ४० च्या जवळपास आहे. टोलनाक्यांवर दिवासाला किती गाडय़ा गेल्या, त्यांच्याकडून किती पैसे आकारण्यात आले, याची माहिती मिळावी, यासाठी प्रत्येक टोलनाक्यांवर इलेक्ट्रिक मशिन लावण्यात येील. त्यात काही घोळ होण्याची शक्यता नाही. कोल्हापूरचे टोलनाके बंद करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे पाटील म्हणाले.