नरसी डीचपल्ली महामार्गावर कासराळीजवळ रेतीचा ट्रक आणि ट्रॅव्हल्स बसचा सकाळी सहाच्या सुमारास भीषण अपघात झाला. यामध्ये पाचजण जागीच ठार झाले, तर आठ जण गंभीर जखमी झाले. जखमींमधील दोघांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी बिलोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

नरसी-डीचपल्ली महामार्गावरील कासराळीजवळ महावितरणाच्या केंद्रावर रेती भरुन नांदेडकडे जाणारा ट्रक आणि पुण्याहून तेलंगणाच्या नंदीपेटकडे जाणार्‍या ट्रॅव्हल्सचा सकाळी ६ च्या सुमारास भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भयानक होता, की रेतीच्या ट्रकने ट्रॅव्हल्सचा ड्रायव्हरकडील भाग पूर्णतः चिरत नेला. यात जयश्री गणपत कडतन (वय ५५), विजयमाला विजय कडतन (वय ३५), सार्थक रवींद्र मगजे (वय १२), प्रशांत पंडीत (चालक, वय ३०), कस्तुरी गंगाराम कडतन (वय ६२) हे पाच जण जागीच ठार झाले.

जखमींमध्ये गंगाराम पंढरीनाथ कडतन (वय ८०), रेखा मुकेश कडतन (वय २७), प्रथमेश मुकेश कडतन (वय ८), गणपत पंढरीनाथ कडतन (६२), पंकज विजय कडतन (वय २४) यांचा समावेश आहे. हे सर्वजण पुण्याचे रहिवासी आहे. यासोबतच वरद संतोष  चित्ते (वय १२), राजेश्री नरेंद्र चित्ते (वय ४०), रेवती संतोष चित्ते (वय ४०) हेदेखील अपघातात जखमी झाले आहेत. हे सर्व धनकवडीचे रहिवासी आहेत. या व्यतिरिक्त अन्य सहाजण ट्रॅव्हल्समधून प्रवास करत होते. मात्र त्यांना दुखापत झाली नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन ट्रक ताब्यात घेतला असून ट्रकचालकाविरुद्ध बिलोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.