मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेले एकमेव थंड हवेचे ठिकाण पर्यटकांच्या गर्दीमुळे गजबजून गेले आहे. येथील थंडगार वातावरण यामुळे मुंबईपासून पुणे आणि प्रामुख्याने गुजरात राज्यातील पर्यटक माथेरानला गर्दी करीत असतात. बाहेर असलेला प्रचंड उष्मा या उलट परिस्थिती माथेरानमध्ये असून गारेगार वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक येत आहेत. दरम्यान, माथेरानच्या पर्यटन व्यवसायाला दर वर्षी भेडसावणारी पाण्याची समस्या या वर्षी अजिबात जाणवत नाही. कारण हॉटेल आणि लॉजिंग-बोìडगसाठी या वर्षी भरपूर पाणी उपलब्ध असल्याची माहिती माथेरान गिरिस्थान नगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी दिली आहे.
माथेरान या ब्रिटिशांनी शोधून काढलेल्या थंड हवेच्या ठिकाणावर पिण्याचे पाणी शाल्रेट तलावाची निर्मिती करून तेथेच उपलब्ध केले होते. ज्या वेळी माथेरानला येथील प्रदूषणमुक्त वातावरण यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येऊ लागले तेव्हा शाल्रेट लेकचे पाणी कमी पडू लागले. १९७८ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने नेरळ येथील उल्हास नदीवर उद्भव असलेली नळपाणी योजना राबविली. कालांतराने माथेरानमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याने पाण्याची टंचाई उन्हाळ्यातील पर्यटन हंगामात जाणवू लागली. २०११मध्ये राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी स्थानिक आमदार सुरेश लाड यांच्या आग्रहास्तव पर्यटन अनुदानातून ३५ कोटींची नळपाणी योजना मंजूर केली. या वर्षी या नवीन नळपाणी योजनेचे पाणी माथेरानमध्ये पोहोचले असून मुबलक पाणी सर्वाना मिळत आहे. अधिक प्रेशरने पाणी नेरळपासून माथेरान डोंगर चढून माथेरानच्या सर्वात उंच भागात असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचते.
त्यामुळे माथेरानच्या शाल्रेट लेकवर पाणी उचलण्याचा भार जीवन प्राधिकरणवर पडला नाही. सध्या शाल्रेट लेकमध्ये ३० फूट पाणी असून २०१५ मध्ये या दिवशी लेकमधील पाण्याची पातळी ८-९ फूट एवढी खाली गेली होती. त्यामुळे मागील वर्षी पिण्याचे पाण्याचे जे संकट पर्यटन हंगामावर ओढवले होते, ती परिस्थिती या वर्षी अजिबात जाणवत नाही. दुसरीकडे माथेरानचा पर्यटन हंगाम पाणी मुबलक उपलब्ध असल्याने अधिक चांगला जाईल अशी खात्री माथेरानच्या हॉटेल व्यावसायिक यांना आहे. नेरळ येथून उल्हास नदीचे पाणी माथेरानपर्यंत विनाअडथळा पोहोचत असल्याने पाण्याचे संकट संपले असल्याची सर्वाची भावना झाली आहे.
२०१३-२०१४मध्ये विजेचे भारनियमन होत असताना पाणी सुरळीत माथेरानपर्यंत पोहोचावे म्हणून तब्बल तीन ठिकाणी जनरेटर बसविले होते.
या वर्षी नेरळ कुंभे येथील पंप हाऊसमधून दररोज १६-१८ तास पाणी उचलले जात आहे. १५ जूनपर्यंत पर्यटन हंगाम सुरू असतो, जून अखेपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शाल्रेट लेकमध्ये आहे. नवीन पाणी योजनेचे पाणी अधिक दाबाने येत असल्याने पाणी समस्या सुटली आहे. नवीन वाढीव नळपाणी योजनेचे पाणी सुरू झाल्याने या वर्षी आणि भविष्यात पुढे माथेरानमध्ये पाणीटंचाई जाणवणार नाही असा पालिकेला विश्वास आहे,’ असे नगराध्यक्ष गौतम गायकवाड यांनी सांगितले.
‘नेरळ येथील जास्तीत जास्त पाणी उचलले जात आहे, माथेरानमधील शाल्रेट लेकचे पाणी आम्ही स्टँडबाय ठेवून दिले आहे. मागील महिन्यापासून तेथून पाणी उचलत नाही,’ असे जीवन प्राधिकरणाचे उप अभियंता के. बी. तरकार यांनी असे सांगितले.