राज्य सरकाराने महाविद्यालयात होणाऱ्या रॅगिंगविरोधात कडक पावले उचलण्याचे ठरवले असून, यापुढे रॅगिंग करताना आढळल्यास संबंधितांना पाच वर्षांच्या प्रवेशबंदीला सामोरे जावे लागेल. महाविद्यालयात सर्रास होणारे रॅगिंगचे प्रकार थांबवण्यासाठी ही कठोर उपाययोजना अंमलात निर्णय घेतल्याचे उच्च तंत्र शिक्षण खात्याचे राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी २८ शासकीय महाविद्यालयांमध्ये रॅगिंगविरोधी समिती स्थापन करण्याचे आदेशही दिले आहेत. याशिवाय, महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार आढळल्यास, विद्यार्थ्यांबरोबरच संबंधित संस्थेतील पदाधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचा इशारा रविंद्र वायकर यांनी दिला. आगामी काळात रॅगिंगमुळे कोणाचाही बळी जाऊ नये, यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.