शेतकऱ्यांची जाण असणारा एकही नेता भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये नाही, अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे यंदाही दिवाळी काळी असेल, अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी राज्य सरकारवर तोंडसुख घेतले आहे.

अक्कलकोट येथे गुरूवारी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी भाजप-सेनेच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. ‘राज्यातील व केंद्रातील भाजप सरकार जनतेच्या प्रश्नावर पळ काढणारे आहे,’ अशी टीका त्यांनी केली. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जनतेच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील आहेत. मराठवाड्याला दिलेले पॅकेज फसवे आहे. मेक इन इंडियाची घोषणाही फसवीच आहे, ‘ अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. भाजपमध्ये दरबारी राजकारण चालते, अशी टिकाही यावेळी पवारांनी केली.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधील व्यंगचित्रावरुन अजित पवारांनी शिवसेनेला रडारवर घेतले. ‘शिवसेनेने मराठा मोर्चांची शिवसेनेने कुचेष्टाच केली असून त्याबद्दल जनता शिवसेनेला माफ करणार नाही. शिवसेनेचे हे राजकारण दुर्दैवी आहे,’ असे म्हणत अजित पवारांनी शिवसेनेवर तोफ डागली.