आंबोलीतील सहा धबधब्यांच्या ठिकाणी पायऱ्या, रेलिंगचे काम करून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ६० लाख रुपये खर्चून ड्रीम फॉलची संकल्पना साकारलेल्या कामाची  पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज पाहणी केली.

आंबोलीत सर्व धबधब्यांच्या ठिकाणी पायऱ्या, रेलिंग, व्हिविंग गॅलरी असे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. मुख्य धबधब्याबरोबर घाटातील आणखी सहा धबधब्यांची पाहणी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. धबधब्यांच्या वर चढून पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. या कामासाठी ६० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभाग मिळून हे काम करणार आहे. हे काम तातडीने करायला अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकामाचे कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे, उपअभियंता अनामिका चव्हाण, शाखा अभियंता विजय चव्हाण, उपवनसंरक्षक रमेश कदम, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार सतीश कदम, मयूराज कमतनुरे, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, माजी सरपंच जगन्नाथ गावडे, उपसरपंच शिवाजी गावडे, विलास गावडे, बबन गावडे, नारायण कोरगावकर आदी उपस्थित होते.

यावेळी आंबोली हर्बेरियम सेंटर येथे वाहनतळ करण्यात येणार आहे व घाटात वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वनखात्यातर्फे बसेसची सोय करण्यात येणार आहे. घाटात कोणालाही गाडय़ा पाग करता येणार नाहीत. वळणावळणाच्या जागेत गॅलरी व वरून शेड बनवण्यात येणार आहे. वस येथे पाण्यात डुंबण्यासाठी छोटी तळी वनराई बंधारा घालून करण्यात येणार आहे. पूर्वीच्या वस येथील नादुरुस्त गजिबोची  दुरुस्ती करण्यास सांगितले. तसेच चोरीला गेलेल्या ग्रिलच्या ठिकाणी नवीन ग्रिल बसवायला सांगितले. आंबोली घाट एक आकर्षक पर्यटन स्थळ बनवण्याचा निर्धार दीपक केसरकर यांनी केला. पावसाळ्यापूर्वी तातडीने काम करण्याचा संकल्प केला. धबधब्यांच्या ठिकाणी वळणावळणाच्या पायऱ्या व गॅलरी असणार आहेत. जे पर्यटक गाडय़ा घेऊन येतात त्यांना धबधब्याच्या ठिकाणी थांबता येणार नाही. त्यांच्यासाठी आंबोली ते धबधबा अशा खासगी बसेस सोडण्यात येणार आहेत.

दरम्यान पूर्वीचा वस ते पारपोली पायवाट पर्यटनमधून करण्यास सांगितले. नवीन धबधबे विकसित करण्यात येणार आहेत. मात्र वरून पाण्याबरोबर येणाऱ्या दगडांना कसे थोपवणार, निदान वरून तरी कुंपण घातल्यासारखी जाळी बसवायला हवी. मृत्यूचे सापळे बनू नयेत यासाठी खबरदारीही महत्त्वाची आहे. पर्यटकांना सुरक्षेची हमी असली तरच पर्यटन वाढणार, अन्यथा गालबोट लागेल. दरम्यान वनपाकीच्या कामांचीही पाहणी पालकमंत्री केसरकर यांनी केली.