गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात शासनाकडून अनास्था दाखवली जात असताना नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी गावच्या युवकांनी शिवजयंती साध्या पध्दतीने साजरी करून उर्वरित रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटूंबाला देत एक आदर्श घालून दिला आहे.
दोस्ती ग्रुपच्या युवकांनी शिवजयंती साध्या पद्धतीन साजरी करुन उरलेल्या वर्गणी साक्री तालुक्यातल्या छाईल गावातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला दिली आहे.
गारपिटीनंतर शासन आणि राजकारण्यांनी शेतकऱ्यांना त्वरीत मदत देणे अपेक्षित असताना आचारसंहितेचे कारण पुढे करत सर्वच पक्षांनी शेतकऱ्यांनाो वाऱ्यावर सोडल्याचे चित्र दिसत आहे. या सर्व राजकारण्यांच्या वृत्तीला चपराक देत कुठलंही राजकारण न करता नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी गावातील काही युवक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले. दोस्ती ग्रुपच्या युवकांनी बुधवारी गावातून शिवजयंतीसाठी जमविलेला निधी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना दिला. रक्कम जरी छोटी असली तरी या युवकांनी राबविलेल्या उपक्रमाच्या उंचीचा स्तर मात्र मोठा आहे. शासकीय यंत्रणा, खासदार, पुढारी यां सर्वानी वडिलांच्या निधनानंतर भेटीची औपचारिकता पार पाडली. मात्र मदतीचा पहिला हात या युवकांनी दिला, अशी प्रतिक्रिया चत्राम कुवर याचे पुत्र विनोद कुवर यांनी व्यक्त केली. या युवकांनी नंदुरबार ते छाईल असा ७० किलोमीटर प्रवास करुन या कुटूंबाला आधार देण्याचा केलेला हा पयत्न शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे राजकारण करणाऱ्या नेत्यांना चपराक तर आहेच.