कोपर्डी घटनेतील दोषी आरोपींना फाशी द्यावे, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, आदी विविध ३२ मागण्यांसाठी सोलापुरात बहुजन क्रांती महामोर्चा निघाला. परंतु या महामोर्चातून मराठा समाजाच्या अॅट्रॉसिटी कायद्याविषयीच्या भूमिकेच्या विरोधात प्रतिक्रिया स्पष्ट प्रकटली. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत कोणताही विरोध नाही. परंतु अॅट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा किंवा त्यात दुरुस्ती करावी, अशी मराठा समाजाची मागणी असेल तर त्याविरोधात प्रखर लढा द्यावा लागेल, असा इशारा देताना मोर्चातील सभेत भडक व चिथावणीखोर वक्तव्ये केली गेली. या महामोर्चात विविध सुमारे २१० संघटनांच्या सक्रिय पािठब्यासह सुमारे दोन लाखांचा जनसमुदाय सहभागी झाला होता. न्यू बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातून हा महामोर्चा निघाला आणि इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर पोहोचला. तेव्हा मोर्चाचे दुसरे टोक प्रारंभस्थळाजवळच होते. तरुण मुले-मुलींसह आबालवृद्ध नागरिकांचा सहभाग उल्लेखनीय होता. यात नवबौद्ध, मातंग, चर्मकार, ढोर, बुरुड आदी अनुसूचित जातींसह अनुसूचित जमाती, बहुसंख्य ओबीसी, भटक्या विमुक्त जाती-जमाती तसेच मुस्लिम समाजाचा समावेश होता. महिलांची गर्दी तेवढीच मोठी होती. घोषणा देताना शिस्त आणि शांतता राखत हा महामोर्चा पुढे सरकत असताना त्याचे नियोजन सुमारे दहा हजार स्वयंसेवक करीत होते. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील जनतेचा सहभाग कमी प्रमाणात दिसून आला. महापौर प्रा. सुशीला आबुटे यांच्यासह काही मोजक्या लोकप्रतिनिधींचा अपवाद वगळता राजकीय पक्षांचे नेते व लोकप्रतिनिधी मोर्चात अभावानेच दिसत होते. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, कोपर्डी घटनेतील दोषी आरोपींना फाशी द्यावे. परंतु अॅट्रॉसिटी कायद्यात कोणताही बदल करू नये अथवा हा कायदा रद्द करू नये, अशी मागणी मोच्रेकऱ्यांच्या सभेत केली गेली. अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या मराठय़ांना छत्रपती शिवरायांचे नाव घेण्याचा नतिक अधिकार नाही. यात आणखी अन्याय-अत्याचार करण्याचा परवाना द्या, असेच म्हटल्यासारखे आहे, अशी टीका बामसेफ संघटनेचे नेते वामन मेश्राम यांनी या सभेत केली. ते म्हणाले एका महिलेची अब्रू लुटणाऱ्या पाटलाचे हातपाय तोडण्याचा हुकूम स्वत: छत्रपती शिवरायांनी दिला होता. म्हणजेच शिवशाहीत अॅट्रॉसिटी कायदा अस्तित्वात होता आणि तो अधिक कठोर होता. असाही आरोप मेश्राम यांनी केला. या वेळी ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी हक्काची लढाई जातिपातीच्या नावाने लढू नये असे सांगितले. या वेळी राजा इंगळे, काँग्रेसचे नगरसेवक देवेंद्र भंडारे, जयदीप कवाडे आदींची भाषणे झाली. यापकी काही वक्त्यांनी भडक आणि चिथावणीखोर भाषणे केली. संविधान आणि तिरंगा.. संविधानाच्या सन्मानार्थ काढण्यात आलेल्या बहुजन क्रांती महामोर्चात प्रत्येकी २० बाय १०० फूट आकाराचे संविधान आणि तिरंगा ध्वज प्रमुख आकर्षण ठरले. एवढय़ा मोठय़ा आकाराचे संविधान व तिरंगा ध्वज हे उच्चांकी स्वरूपाचे असल्याचा दावा संयोजकांनी केला आहे.