शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शनिवार संध्याकाळपासून रत्नागिरी जिल्ह्य़ात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. बाजारपेठा, हॉटेल्स, सर्व प्रकारचे व्यवसाय या बंदमध्ये सहभागी झाले होते. फक्त पेट्रोल पंप बंदमधून वगळण्यात आले. मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूकही अतिशय कमी होती. जिल्हाभरातील शिवसेनेचे प्रमुख नेते व कार्यकर्ते अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी मुंबईला रवाना झाले. बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जागोजागी फलक लावण्यात आले होते.