राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्याऐवजी आपल्याच घरात खासदारकी व आमदारकी घेणाऱ्या छगन भुजबळ यांना ओबीसी घटकातील इतरांवर कितीही अन्याय झाला तरी त्याच्याशी काही देणेघेणे नसते. संकटात सापडल्यावरच भुजबळांना ओबीसींची आठवण येते, अशी तोफ डागत राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी भुजबळांना घरचा अहेर दिला आहे. येथे माळी समाजाच्या अधिवेशनात आपणास ओबीसी म्हणून टारगेट केले जात असल्याचे वक्तव्य पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अलीकडेच केले होते. तो धागा पकडून शेलार यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. दरम्यान, शेलारांच्या स्वभावदोषामुळे अनेक सहकारी दुरावल्यानंतर त्यांना नैराश्य आले असून भविष्य अंधकारमय दिसू लागल्याने ते भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यांवर आरोप करीत असल्याचे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ. कैलास कमोद यांनी दिले आहे.
ओबीसी व माळी म्हणजे केवळ तेवढे भुजबळच का, असा सवालही शेलार यांनी पत्रकार परिषदेत केला. खरेतर भुजबळ राजकारणात प्रवेश करण्यापासून आर्थिकदृष्टय़ा भक्कम होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर आमदार व खासदार असे सर्व काही म्हणजे भुजबळ हे समीकरण बनले. सत्ताकेंद्र डळमळीत होण्यास सुरुवात झाली की नेत्यांना घाबरविण्यासाठी भुजबळ समता परिषदेच्या बैठका, शक्तीप्रदर्शन व महामेळाव्यांचा बागुलबुवा, असे राजकारण करतात. ओबीसींमुळे खासदारकीच्या निवडणुकीत त्यांना विजय मिळाला. त्याची त्यांनी किती परतफेड केली, असा सवालही शेलार यांनी केला. आपल्याच घरात खासदारकी व आमदारकी, आपल्या मताप्रमाणे महामंडळाचे अध्यक्ष, विधान परिषदेचे आमदार, तरी आपणास टारगेट केले जात असल्याचा कांगावा कितपत सत्य आहे?, राजकीय ढग गडद झाले की, ओबीसी व माळी समाजावर अन्याय होत असल्याचा टाहो फोडला जातो, हे कितपत योग्य आहे, असा मुद्दाही शेलार यांनी मांडला आहे.    

शेलार यांचे आरोप चुकीचे -डॉ. कमोद
शेलार यांचे आरोप डॉ. कैलास कमोद यांनी धुडकावून लावले आहेत. समाजाचे अधिवेशन असल्यामुळे माळी समाजाच्या अडचणी व इतर बाबींची चर्चा होणे स्वाभाविक होते. त्यानुसार समाजाच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक प्रश्नांवर चर्चा झाली. त्यात भुजबळ यांनी कोणत्याही परिणामांची चिंता न करता मत प्रदर्शित करणे स्वाभाविकच होते व ते अपेक्षेनुसार झाले. त्यात भुजबळ हे राजकीय क्षितिजावरील माध्यम सेलिब्रिटी असल्याने त्यांच्या वक्तव्याचे अनेकविध अर्थ लावणे स्वाभाविकच आहे. शेलार यांना भुजबळांनी १९९२ मध्ये काँग्रेसकडून प्रथम नगरसेवकपदाची उमेदवारी आणि त्यानंतर प्रत्येक निवडणुकीतही ती मिळवून देण्याचे काम केले. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदीही त्यांची निवड करताना भुजबळांनी पक्षातील इतर मातब्बर नेत्यांचा रोष पत्करला. महापौरपदाच्या निवडणुकीत कोण किती वेळा आणि का फुटले, याची कल्पना संपूर्ण शहरास आहे, असा टोला डॉ. कमोद यांनी लगावला. भुजबळ यांनी ओबीसी व इतर मागासवर्गातील इतर जातीच्या कार्यकर्त्यांना प्रयत्नपूर्वक न्याय मिळवून दिला. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था अशा ठिकाणी प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी भुजबळांचे पाठबळ कामी आले ही वस्तुस्थिती माहिती असूनही शेलार ते सांगण्याचे टाळतात, असा आक्षेप डॉ. कमोद यांनी नोंदविला आहे.