सांगलीत १५ दिवसांत ३८ पक्ष्यांचा मृत्यू

गेल्या १५ दिवसांत सांगलीच्या तापमानात अनपेक्षित वाढ झाल्याने ३८ पक्ष्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला असून, गेल्या आठ दिवसांपासून तेवढय़ाच पक्ष्यांवर उपचार सुरू आहेत. तीव्र उष्णतेमुळे पक्ष्यांना वारेफोडय़ासारखा आजार होत असून, यामुळे पक्षी आकाशात विहार करीत असतानाच जमिनीवर कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे.

मार्च मध्यापासून सांगलीचे तापमान ३८ अंशावर गेले असून, गेल्या दोन दिवसांत हे तापमान कमी झाले असले तरी तत्पूर्वी तापमान ४२.९ अंशावर तीन दिवस स्थिर होते. या वाढत्या तापमानाशी जुळवून घेण्यात पक्ष्यांना अशक्य झाल्याने उष्माघाताने ३८ पक्ष्यांना आपले प्राण गमवावे लागले. उष्माघाताने मृत्युमुखी पडणाऱ्या पक्ष्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण पारव्याचे असून, गेल्या १० दिवसांत १४ पारवे मरण पावले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या इतर पक्ष्यांमध्ये बुलबुल (६), कावळे (४), चिमण्या (९), सुगरण (२), साळुंकी (१) आदींचा समावेश आहे. तर उष्माघाताने जमिनीवर अचानक पडल्याने जखमी झालेले आणि पंखाखाली पुरळ उठून हवेत तरंगण्यास असमर्थ ठरलेले विविध प्राणी व पक्षी प्रथमोपचार केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.

प्रथमोपचार केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या पक्ष्यांमध्ये बुलबुल मोठे- ८, लहान- ३, कावळा- ३, िपगळा- १, बदामी घुबड- १, पोपट- १, पारवा- ८, चिमणी- ३, सुगरण- १, साळुंकी- २, पाणकावळा- १, व्हला- ५ आदींचा समावेश आहे.

पक्ष्यांना नसíगक खाद्य शहरात दुर्मीळ झाले असतानाच नसíगक पाण्याचे स्रोतही लवकर आढळत नाहीत. पाण्याच्या आणि भक्ष्याच्या शोधात हे पक्षी इमारतीमधून जात असताना अचानक भोवळ आल्याने जमिनीवर पडतात. अशा वेळी या पक्ष्यांना पाण्यात बुडवण्याचा प्रयत्नही अज्ञानी लोकांकडून होतो. याचा परिणाम शरीराचे तापमान आणि थंड पाण्याचे तापमान यांच्याशी जुळवून घेत असतानाच या पक्ष्यांचा हृदयविकाराने मृत्यू होत असल्याचे इन्साफ फाऊंडेशनचे मुस्तफा मुजावर यांनी सांगितले.

दरम्यान, पक्षी जमिनीवर पडला तर तत्काळ मदत देण्यासाठी इन्साफने अॅम्ब्युलन्सची सोय केली असून निरोप येताच इन्साफचे कार्यकत्रे प्रसाद रिसवडे, सूरज खान, पुष्कर कागलकर, दिलीपसिंह ठक्कर, शुभम कुरुंदवाडे आदी घटनास्थळी जाऊन पक्ष्यांना ताब्यात घेऊन प्रथमोपचारासाठी केंद्रात आणत असल्याचेही मुजावर यांनी सांगितले. या प्रथमोपचार केंद्रासाठी रोटरी क्लबनेही मदत केली असल्याने सध्या तीव्र उष्णतेच्या लाटेत सापडलेल्या पक्ष्यांना पिंजऱ्यात उपचार करून बरे झाल्यावर सोडण्यात येत आहे.