सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ताब्यावरून भाजपमध्येच रणकंदन माजले असून खासदार संजय पाटील यांच्या मदतीने गुरुवारी डॉ. गजानन परिश्वाड यांनी प्राचार्य तथा संचालकपदाचा ताबा घेतला. महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीने गेल्या महिन्यात डॉ. परिश्वाड यांना निलंबित केले होते. दरम्यान, या कृतीचा महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीने निषेध केला असून, संजय पाटील यांची ही कृती म्हणजे कुणाची तरी सुपारी घेऊन असल्याची टीका सोसायटीचे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी केली आहे. गुरुवारी वालचंद महाविद्यालयाचा ७०वा वर्धापनदिन साजरा होत असताना महाविद्यालयाच्या ताब्यावरून भाजपमधील राजकीय युद्ध रंगले आहे. महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीने संचालक डॉ. परिश्वाड यांना चार वर्षांचे आíथक हिशोब दिले नाहीत, म्हणून निलंबित करून डॉ. एम. जी. देशमाने यांना प्राचार्य तथा संचालक म्हणून नियुक्त केले होते. त्यांच्या हस्ते स्वायत्त महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते पार पाडण्यात आला, मात्र संजय पाटील, भाजपचे नेते दीपक शिंदे यांच्या उपस्थितीत डॉ. परिश्वाड यांनी पुन्हा संचालक व प्राचार्यपदाची सूत्रे हाती घेतली. ‘खासदारांना जाब द्यावा लागेल’ वालचंद महाविद्यालयाचे संचालक एम. जे. देशमाने यांना धक्काबुक्की करून ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, हे कृत्य बेकायदेशीर आहे. पाटील हे संस्थेचे सभासदही नसताना त्यांनी केलेला हा प्रयत्न चुकीचा असून, त्यांना याचा जाब द्यावा लागेल, असे मत महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी व्यक्त केले.