भाजपनेच प्रोत्साहन दिल्यामुळे ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल् मुसलिमीन’ अर्थात ‘एमआयएम’ला विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित यश मिळाल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. अलिबागमध्ये आयोजित राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात ते बोलते होते. भाजपच्या एका गटाने सेक्युलर मतं विभागण्याचा प्रयत्न करत ‘एमआयएम’ला शक्ती देण्याचं काम केल्याचंही ते म्हणाले.

‘एमआयएम’च्या नेत्यांची भाषणं अत्यंत भडकावू असतात आणि त्यांची भाषा धोकादायक आहे. त्यामुळे सामाजिक ऐक्य धोक्यात येऊ शकतं. पवार म्हणाले, ‘एमआयएम’मुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्यामुळे मुस्लिम समाजाला जागृत करावं लागेल.

भायखळा मतदार संघातून निवडून आलेले वारिश युसूफ पठाण आणि औरंगाबाद मध्यमधून इम्तियाझ जलिल हे दोन आमदार विधानसभेत ‘एमआयएम’चे प्रतिनिधित्व करत आहेत.
‘एमआयएम’च्या दोन्ही आमदारांनी विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच विधानसभेत विरोधी बाकांवर बसणार असल्याचेही एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल यांनी जाहीर केले होते.