सणासुदीच्या तोंडावर दरांत वाढ; दोन दिवसांत बाजारात तेजी दिवाळीला अवघे आठ दिवस उरले असताना बाजारात अद्याप मंदी असली, तरी हरभरा डाळीचे दर वेगाने दीडशे रुपये किलोकडे झेपावत आहेत. गेल्या दोन दिवसांत बाजारात हरभरा डाळीचा दर किलोला १४२ वर पोहोचला असून दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न सामान्य माणसापुढे निर्माण झाला आहे. सणाचे दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यापासून हरभरा डाळीच्या दरात चढती कमान आहे. ऑगस्टमध्ये चणा डाळीच्या दरात एकदम २० रुपयांनी वाढ होऊन किलोला ८० रुपये दर झाला होता. मात्र त्यानंतर हा दर कमी होण्याऐवजी वाढतच गेला आहे. दसरा सणाला १२० रुपये किलो असलेली हरभरा डाळ दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर १४० ते १४२ रुपये किलो दराने बाजारात मिळत आहे. ठोक खरेदीचा दर क्विंटलला १३ हजार ५०० रुपयांवर पोहोचला असल्याचे व्यापारी विवेक शेटे यांनी सांगितले. मात्र या वर्षी केरळमधून खोबऱ्याची मोठय़ा प्रमाणात आवक झाल्याने आणि स्थानिक पातळीवरही सुके खोबरे उपलब्ध होत असल्याने खोबऱ्याचे दर २०० रुपयावरून १२० रुपये किलोपर्यंत घसरले आहेत. खाद्यतेलाचे दर स्थिर असून बाजारात सरकी, शेंगतेल मुबलक उपलब्ध असून ८० ते १०० रुपये किलो या दरात उपलब्ध आहे. दिवाळीसाठी लागणाऱ्या अन्य किराणा मालामध्ये रवा २८ रुपये मदा २६ रुपये किलोने मिळत असून पोहेचा दर ६० पासून ८० रुपयांपर्यंत आहे. पिठी आणि लिसा साखरेचे दर ४२ रुपये असून साधी साखर ३८ रुपये किलो दराने विकली जात आहे. यंदा बाजारात चांगल्या पावसामुळे मोठय़ा प्रमाणात उलाढाल होईल अशी व्यापारी वर्गाची धारणा असली तरी सण आठ दिवसावर आला तरी बाजार अद्याप थंडच आहे. वाण सामान खरेदी करून फराळाचे पदार्थ घरी बनविण्यापेक्षा तयार पदार्थच आणण्याकडे कल दिसत असल्याने बाजारपेठ अद्याप थंड असल्याचे सांगण्यात आले. दिवाळीत डाळींची टंचाई होणार नाही : गिरीश बापट पुणे : केंद्राने ७०० मेट्रिक टन डाळ देण्याचे मान्य केल्यामुळे यंदाच्या दिवाळीत डाळींची टंचाई निर्माण होणार नाही, अशी ग्वाही अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी दिली. देशामध्ये ३० टक्के डाळींची निर्मिती होत असून ७० टक्के डाळ ही आयात करावी लागत आहे, असे सांगून बापट म्हणाले, नागरिकांना सणासुदीला डाळ मिळावी या उद्देशातून अन्न आणि नागरी पुरवठा विभागातर्फे शिधापत्रिका दुकानांतून १०३ रुपये तर, ग्राहक भांडारांमध्ये ९५ रुपये किलो या दराने उपलब्ध करून दिली आहे. केंद्राने ७०० मेट्रिक टन डाळ उपलब्ध करून देण्याचे मान्य केले असून ती दोनतीन दिवसांत मिळेल, असे बापट म्हणाले.