सुप्रिया सुळे यांचा टोला ‘राज्यात सरकारविरोधी कुणी सूर काढला की लगेच मुख्यमंत्री त्यांना तुमची कुंडली आमच्याकडे आहे, असा धमकीवजा इशारा देतात. मुख्यमंत्र्यांना एवढीच कुंडल्या बघण्याची आवड असेल तर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन ज्योतिषी बनावे’, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संघटनात्मक आढावा घेण्यासोबतच प्रतिष्ठित नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी त्या अकोल्यात आल्या होत्या. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, राज्यातील विविध जिल्ह्य़ातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींना यांचे आíथक उत्पन्न वाढण्याकरिता मदत करण्यात येणार आहे. त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्चही आम्ही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी होती. त्यामध्ये कोणत्याही अटी नकोत. राज्यात मध्यावधी निवडणुकांसंदर्भात त्या म्हणाल्या, कोणताही पक्ष हा निवडणुकीसाठी नेहमीच तयार असतो. देशात लोकसभेच्या निवडणुका केव्हा होतील, हे सांगता येईल, मात्र विधानसभेच्या निवडणुका केव्हा, हे सांगता येणार नसल्याचे सांगत मध्यावधी निवडणुका होऊ शकतात आणि त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. २०२९ पर्यंत लोकसभेतच मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहे का? या प्रश्नांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपण २०२९ पर्यंत लोकसभेतच काम करणार असल्याचे सांगून राज्यातील राजकारणात परतण्याची शक्यता फेटाळून लावली. आपण दिल्लीतच रमत असल्याचे त्यांनी सांगितले.