शेतातील उघडय़ा कूपनलिकेच्या खड्डय़ात पडून २० फुटांवर अडकून पडलेल्या मंगेश अनिल जाधव या सहावर्षीय बालकास वाचवण्याचे सुमारे ११ तासांचे अथक प्रयत्न अखेर निष्फळ ठरले. नाकातोंडामध्ये माती गेल्याने मंगेशचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर ५०० ते ६५० फूट खोल कूपनलिका खोदता येते का, आणि कूपनलिकेच्या उघडय़ा खड्डय़ाला जबाबदार कोण, हे प्रश्न या दुर्दैवी घटनेने समोर आले आहेत. माण तालुक्यातील विरळी-कापूसवाडी येथे उघडय़ा विंधनविहिरीत मंगेश अडकून पडल्याची घटना काल सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आणि आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास मंगेशला बाहेर काढण्यात यश आले, पण तत्पूर्वीच त्याने अखेरचा श्वास घेतल्याचे स्पष्ट होताच त्याचे आई, वडील, भाऊ, आजी आदी नातेवाईकांसह हितसंबंधितांचा आक्रोश उपस्थितांचे हृदय हेलावून टाकणारा होता. काल दुपारी खेळता खेळता मंगेश कूपनलिकेच्या उघडय़ा खड्डय़ात पडून अडकल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. दूरचित्रवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी काही मिनिटांत घटनास्थळी दाखल होत येथील आँखो देखा हाल प्रसारित केल्याने मंगेशच्या बचावाचे प्रयत्न सर्वदूर पाहिले जात होते. गावकऱ्यांनी या खड्डय़ात दोर सोडून त्यास मंगेश पकडेल आणि आपण त्यास बाहेर काढू अशा भाबडय़ा आशेने पहिले प्रयत्न केले. यानंतर शेजारीच जेसीबीच्या साहाय्याने खड्डा काढून अंतर्गत मार्ग निर्माण करीत त्यातून मंगेशला सुखरूप बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न झाले. दुर्दैवाने राष्ट्रीय आपत्ती सुरक्षा दलाचे (एनडीआरएफ) पथक उशिरा पोहोचल्याने नको तो अनर्थ घडून गेला. आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास एनडीआरएफच्या पथकाने कूपनलिकेच्या खड्डय़ाच्या शेजारी जेसीबीने खणलेल्या खड्डय़ात उतरून मंगेशला बाहेर काढण्यात यश मिळवले, मात्र यापूर्वीच या चिमुकल्या जिवाने आपली जगण्याची धडपड गमावली होती. म्हसवड पोलिसात आकस्मिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद झाली आहे.