स्वतंत्र विदर्भावरुन राजकीय कोंडी होऊ नये आणि भाजप-शिवसेनेतील राजकीय मतभेद चव्हाटय़ावर येऊ नयेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसशी समन्वय ठेवून शिताफीने स्वतंत्र विदर्भाचा ठराव टाळला. त्याऐवजी विदर्भ विकासाची चर्चा घडवून आणून आणि घोषणांचा पाऊस पाडून विरोधकांवर राजकीय मातही केली.भाजपचा जरी स्वतंत्र विदर्भाला आणि छोटय़ा राज्यांच्या निर्मितीला पाठिंबा असला तरी आता शिवसेना त्यांच्याबरोबर सत्तेमध्ये आहे. शिवसेनेचा स्वतंत्र विदर्भाला विरोध असून हा ठराव विधानसभेत आला असता, तर त्यांनी त्यास उघडपणे विरोध केला असता. विधीमंडळाच्या पहिल्याच अधिवेशनात स्वतंत्र विदर्भाचा ठराव मांडला जाणे, मुख्यमंत्री व भाजपच्या राजकीय सोयीच्या दृष्टीने योग्य नसते. तसेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळेच विरोधात असल्याने हा ठराव विधानसभेत मंजूर होणे शक्यच नव्हते. नागपूर अधिवेशनात हा ठराव फेटाळला गेला असता, तर मुख्यमंत्र्यांची नामुष्की झाली असती. त्यामुळे काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी मांडलेला स्वतंत्र विदर्भाचा ठराव मुख्यमंत्र्यांनी राजकीय चातुर्य दाखवीत शिताफीने टाळला. वडेट्टीवार यांचा दूरध्वनी लागला नाही. त्यामुळे त्यांचा ठराव कामकाजासाठी निवडल्यावरही काँग्रेस गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करुन त्यावर पुढील अधिवेशनात चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि विधिमंडळ कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी सभागृहात सांगितले. त्याला वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला.भास्कर जाधव म्हणाले..कोकणात अनेक वादळे वा अतिवृष्टी झाली तरी तेथील शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. कोकणातील सर्वच शेतकरी श्रीमंत नाहीत. कोकणातील स्त्री गरिबीचे प्रदर्शन करीत नाही. उलट विदर्भात सातत्याने नकारात्मकतेचे सातत्याने दर्शन होते. विदर्भातील शेतकऱ्याचे सामाजिक प्रबोधन व्हायवा हवे, असे जाधव बोलत असतानाच सत्ताबाकावील सदस्यांनी उभे राहून गलका केला.