उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे संपूर्ण महाराष्ट्र गारठला आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान सरासरीच्या खाली आले असून, मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट निर्माण झाली आहे. रविवारी या हंगामातील सर्वाधिक कमी तापमान नाशिक येथे ४.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. मुंबईत सांताक्रुझ येथे पहिल्यांदाच तापमान दहा अंशापर्यंत खाली आले आहे. पुण्यात किमान तापमान ८.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. येत्या चोवीस तासांत थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे .
उत्तरेकडील राज्ये थंडीने गारठली आहेत. हे थंड वारे दक्षिणेकडे वाहात असल्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका वाढत चालला आहे. किमान तापमानाबरोबर कमाल तापमानातही घट झाली आहे. त्यामुळे दिवसाही थंडी जाणवत आहे. राज्यात सगळीकडेच शेकोटय़ा पेटल्याचे चित्र दिसू लागले आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी सरासरीच्या चार ते पाच अंशांनी तापमान कमी झाले असून, या ठिकाणी थंडीची लाट निर्माण झाली आहे. राज्यात येथे पहिल्यांदाच तापमान चार अंशापर्यंत खाली आले आहे. त्याचबरोबर कोकण-गोवा, मराठवाडा आणि विदर्भात तापमान चांगले खाली गेले आहे.
राज्यातील किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढीलप्रमाणे- पुणे ८.१, मुंबई १६.१, सांताक्रुझ १०.४, अलिबाग १४.५, रत्नागिरी १३.४, पणजी १८.८, जळगाव ७.१, कोल्हापूर १५.५, महाबळेश्वर १४.२, मालेगाव ७, नाशिक ४.४, सांगली १४.५, सातारा ९.३, सोलापूर १४.५, औरंगाबाद १०.१, परभणी ११.२, अकोला ११, अमरावती १२.२, बुलढाणा १३.२, चंद्रपूर १८.२, गोंदिया ११.६, नागपूर १२.९, यवतमाळ ११.६, ब्रम्हपुरी १६.५