कल्याणजवळच्या नेवाळी मध्ये झालेल्या आंदोलनानंतर ठाणे, पालघर, रायगड, मुंबई आणि नाशिक या पाच जिल्ह्यांमधील आगरी, कोळी आणि कुणबी समाज एकत्र येऊन एक समिती स्थापित करणार आहे. या समितीत आगरी, कोळी आणि कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत. या समितीच्या माध्यमातून नेवाळी परिसरातल्या शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न सोडवू अशी माहिती आगरी नेते संतोष केणे यांनी दिली आहे. कल्याण-मलंग आणि बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या नेवाळीतल्या शेतकऱ्यांनी २२ जूनला आंदोलन केलं होतं, या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ करत काही पोलिसांना मारहाण केली होती. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार आणि गोळीबार केला ज्यात १२ शेतकरी जायबंदी झाले होते. या आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांनी धरपकड सुरू केली होती, तसंच १३५ आंदोलकांवर गुन्हे दाखल करत ५८ आंदोलनकर्त्यांना अटक केली होती. अटक केलेल्या आंदोलनकर्त्यांना मारहाण होत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्याचमुळे एक समिती स्थापन करून या आंदोलकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कल्याण आणि परिसरातल्या इतर आंदोलन समित्यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. नेवाळीच्या आंदोलनकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाच जिल्ह्यांची समिती स्थापण्यात आली आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी समिती आवाज उठवणार आहे असंही आगरी समाजाचे नेते संतोष केणे यांनी सांगितलं आहे.