येथील गरिमा श्रीकांत कर्वा हिने आपल्या सहकाऱ्यांसोबत सादर केलेली कल्पना देशात अव्वल ठरली. वालचंदच्या चमूने तब्बल ५० हजारांचे पारितोषिक पटकावले.
जॉन डियर कंपनीने देशभरातील भावी अभियंत्यांना तंत्रज्ञानातील अभिनव कल्पना सुचवण्यासाठी आवाहन केले होते. यात तब्बल साडेतीन आयडिया सादर करण्यात आल्या. वालचंद महाविद्यालयातील चमूने निर्माण फॅक्टरी इन्फॉम्रेशन सिस्टीम या नावाने एखाद्या कारखान्याचे इत्थंभूत नियंत्रण अँड्रॉईड मोबाइलद्वारे करता येईल, अशी यंत्रणा विकसित केली. स्पध्रेत आयआयटीसह देशभरातील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. वालचंदच्या चमूत लातूरच्या गरिमा कर्वाचा समावेश होता.
मागील ३ वर्षांपासून कंपनीने देशस्तरावर ही स्पर्धा आयोजित केली. पुण्यातील मगरपट्टा सिटीत वालचंदच्या चमूने या प्रकल्पाचे सादरीकरण केले. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला. इलेक्ट्रिकल शाखेच्या गरिमा कर्वा, सुमेध नितनवरे, इलेक्ट्रॉनिक्सचा सुरेश पाटील, ओंकार वाटवे, कुणाल जगदाळे यांनी प्रा. एस. के. परचंडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सादर केला. मागील ६ महिने या चमूने विविध पातळय़ांवर काम करीत ही यंत्रणा विकसित केली. या प्रकल्पाचे कागदविरहित उद्योग हेच अंतिम उद्दिष्ट आहे. त्यात उद्योगातील उत्पादन निर्मिती प्रक्रिया, सुरक्षा, गुणवत्ता नियंत्रण, कार्यक्षमता अशा विविध निकषांवर अत्याधुनिक माहिती मोबाइलवर अपलोड होते. या यशाबद्दल गरिमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्रे सत्यनारायण कर्वा यांची गरिमा ही नात आहे. गरिमाचे दहावीपर्यंतचे शिक्षण गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयात, बारावीपर्यंतचे दयानंद विज्ञान महाविद्यालयात झाले. त्यानंतर गरिमाने इलेक्ट्रिकल शाखा निवडून सांगली येथे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. सध्या ती तिसऱ्या वर्षांचे शिक्षण घेत आहे.