आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जागावाटपाच्या मुद्द्यावरून शनिवारी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला. औरंगाबादमधील काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात राष्ट्रवादीने जागावाटपाबाबतचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, असा सूर उमटताना दिसला. खासदार राजीव सातव यांनी राष्ट्रवादीने आघाडीसंदर्भातील निर्णय तातडीने घ्यावेत असे सांगितले. त्यामुळे निवडणुकीत कोणासोबत रहायचे आणि कोणाविरुद्ध लढायचे हे चित्र स्पष्ट होईल, असे म्हणत जागावाटपाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक असल्याचे त्यांनी दाखवून दिले. तर दुसरीकडे, आगामी निवडणुकांमध्ये लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना लवकरात लवकर कामाला लागण्याचा सल्ला काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिला.