माजी राज्यमंत्री लक्ष्मण तथा भाई हातणकर यांचे चिरंजीव, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि काँग्रेसचे युवा नेते संदीप लक्ष्मण हातणकर यांचे शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास मुंबई येथे खासगी रुग्णालयात निधन झाले.राज्याचे माजी राज्यमंत्री भाई हातणकर यांचे दुसरे चिरंजीव असलेले कै. संदीप यांचे बालपण आणि शिक्षण शहरातील विश्वनाथ विद्यालय आणि राजापूर हायस्कूलमध्ये झाले. भाई हातणकर आणि त्यांचे वडीलबंधू विजय हातणकर यांच्या उपस्थितीमध्ये घरामध्ये विविध सामाजिक व राजकीय बैठका होत असत. यामधून संदीप यांना समाजकारण व राजकारणाचे बाळकडू मिळाले. वडील बंधू विजय यांच्या निधनानंतर कै. संदीप यांनी समाजकारण व राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. समाजकारण आणि राजकारणामध्ये वडील भाई हातणकर यांचा वारसा सांभाळताना सर्वसामान्यांच्या हिताला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. काँग्रेसतर्फे केळवली गणातून त्यांनी २००७ मध्ये पहिली जिल्हा परिषदेची निवडणूक लढवताना विजय मिळवला होता. मात्र त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. सहकार क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देताना राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे सलग नऊ वष्रे चेअरमनपद सांभाळले. त्यांनी पतपेढीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे हित जोपासण्याला प्राधान्य दिले. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढवली. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. कुणबी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. जिल्ह्यासह तालुक्यात काँग्रेस रुजवण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. गेल्या काही वर्षांपासून ते मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. मुंबई येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र गेल्या काही दिवसांत त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यामध्येच त्यांचे शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भावजय, पुतण्या, पुतणी, बहिणी असा परिवार आहे.