फेसबुकवरील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले, मात्र त्याला व लग्नालाही कुटुंबीयांनी विरोध केल्याने या प्रेमी युगुलाने शिर्डीतील एका हॉटेलमध्ये विषप्राशन करून जीवनयात्रा संपवली. शिर्डीतील हरजीवन हॉटेलमध्ये ही घटना घडली.
कोमल गोपाल कदम (वय २०, रा. हलकडी, ता. देवळा, जि. रायगड) व कैलास पोपट गाढवे (वय २५, रा. धामणगाव, ता. इगतपुरी, जि. नाशिक) अशी या युगुलाची नावे आहेत. या दोघांची फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती. ही तरुणी अकरावीत शिकत होती, तर हा तरुण बारावीपर्यंत शिकून पुढे शेती करीत होता. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर ही गोष्ट दोघांच्याही कुटुंबीयांना आवडली नाही. त्यांनी या लग्नाला विरोध केला. त्यामुळे हे दोघेही दि. १ मार्चला घरातून पळाले. पंधरा-वीस दिवसांनंतर सोमवारीच हे दोघे शिर्डीला आले होते. ज्या हॉटेलमध्ये ते उतरले होते, तेथे त्याच दिवशी त्यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली. या खोलीतून विषारी औषधाचा वास येत असल्याचे हॉटेलच्या कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. त्याने दरवाजा वाजवला, मात्र आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्या खोलीचा दरवाजा तोडण्यात आला. आतमध्ये दोघे बेशुद्धावस्थेत होते. त्यांना मध्यरात्री अडीच वाजता साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच काही वेळाने दोघांचे निधन झाले. हॉटेलच्या खोलीमध्ये सुसाईट नोट सापडली असून, ‘आम्ही दोघे आत्महत्या करत असून याबाबत कुणालाही दोषी ठरवू नये, आम्हाला माफ करावे’ असा मजकूर त्यात लिहिलेला आहे. शिर्डी पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केलेला असून, या दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन येथील रुग्णालयात येऊन मंगळवारी सायंकाळी सुमारास दोघांच्या नातेवाइकांची ओळख पटवून मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आले.