गेल्या दोन दिवसांत जिल्ह्य़ात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्य़ातील ३४० गावांतील १३ हजार ८५१ शेतक-यांचे २२ हजार ८३६ हेक्टरवरील पिकांचे व फळबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिका-यांना दिला आहे. सर्वाधिक हानी अकोले, श्रीरामपूर, नेवासे तालुक्यात झाली आहे. संगमनेर तालुक्यात थंडीच्या कडाक्याने २३ शेळ्या मेंढय़ा दगावल्या.
गव्हाचे ६ हजार ७४९ हेक्टर, हरभ-याचे ६ हजार ३०६, ज्वारेची २ हजार ७५७, कांदा ३ हजार ९४६, द्राक्षे १४१, डाळिंब २ हजार ६८३, आंबा २५० हेक्टरवर नुकसान झाले. अकोले तालुक्यातील ७५ गावांतील १ हजार ९३० शेतक-यांचे ६ हजाराहुन अधिक हेक्टरचे, श्रीरामपुर तालुक्यातील ५२ गावांतील २ हजार ८०० शेतक-यांचे ८ हजार ४९० हेक्टरवर, नेवासे तालुक्यातील ८० गावांतील ३ हजार ८०० शेतक-यांचे ३ हजार ६३५ हेक्टरचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.