अपघाताचे प्रमाण कमी व्हावे आणि इंधन बचत व्हावी म्हणून खंबाटकी घाटासमोर पुण्याकडे जाताना लागणारे तीव्र वळण काढावे व रस्ता सरळ करावा अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केली आहे.
शिवतारे यांनी या बाबत दिलेल्या पत्रात म्हटले आहे, पुण्याकडे जाणारा खंबाटकीच्या बोगद्यातून आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत.वळणाचा अंदाज न आल्याने हे अपघात होतात.या वळणाची तसेच बोगद्यातून नव्या सरळ मार्गासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी पहाणी करावी ,तसेच पुढील कार्यवाहीही करावी. वळण काढून मार्ग सरळ केला तर अपघात तसेच मार्गाची लांबी कमी झाल्याने इंधनही वाचेल. यासाठी या बाबत तातडीने निर्णय घ्यावा असे शिवतारे यांनी कळवले आहे.
शिवतारे यांनी जिहे-कटापूरसाठी निधी तरतूद करण्याची मागणी जलसंपदा मंत्र्यांकडे  केली आहे. जिहे-कटापूर उपसा सिंचन योजनेसाठी सध्या उपलब्ध असलेल्या १०४ रुपयांचा निधी वापरण्यास विशेष परवानगी देण्यासह आगामी अर्थसंकल्पात आणखी १५० केटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली आहे.या योजने अंतर्गत कृष्णेतले ३.१७ टीएमसी पाणी तीन टप्प्यात उचलून दुष्काळी खटाव, माण भागात नेले जाणार आहे.यात खटाव तालुक्यातील ३९ हजारावर, तर माण तालुक्यातील ३१ हजार ६०० इतक्या, तर दोन्ही मिळून ७० हजार ५२९ लाभार्थ्यांना फायदा होणार आहे
खटाव मधील ११ हजार ७०० हेक्टर, तर माण तालुक्यातील १५ हजार ८०० हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे.दोन्ही तालुके मिळून २७ हजार ५०० हेक्टर जमीन पाण्याखाली येणार असून उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी प्रकल्प १ व २ मधील कामांसाठी अर्थसंकल्पात १५० कोटी रुपयांची मागणी शिवतारे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.