भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात मिठाच्या सत्याग्रहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सिंधुदुर्गात शिरोडा येथेदेखील मिठाचा सत्याग्रह झाला. ब्रिटिशांविरोधात महात्मा गांधीजींनी अनेक चळवळी निर्माण केल्या . त्यात मिठाचा सत्याग्रहदेखील महत्त्वाचा होता. शिरोडा येथे झालेल्या मिठाच्या सत्याग्रहाच्या ठिकाणी ‘नाही चिरा.. नाही पणती’ अशीच अवस्था बनली आहे.साहित्यिक कै. वि. स. खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यांनी शिरोडय़ात ज्ञानदान करताना साहित्य निर्माण केले. त्यांच्या शिरोडय़ातील वास्तव्याचे एक स्मारक विद्यालयात उभारण्यात आले. हे स्मारक सर्वासाठी खुलेही झाले. या ठिकाणी साहित्यिक नक्कीच भेट देतील. शिरोडय़ात मिठाचा सत्याग्रह झाला. १९३० मध्ये महात्मा गांधीजीच्या आदेशानुसार भारतभर मिठाचा सत्याग्रह झाला. या मिठाच्या सत्याग्रहाचे एक आंदोलन शिरोडा येथे घडले. शिरोडय़ातील मंदिरात एकत्र जमून नंतर मिठाचा सत्याग्रह मिठागरे आहेत तेथे करण्यात आला. आजही वटवृक्षाचे झाड त्याची आठवण देत आहे. या वडाच्या झाडाकडे लक्ष दिल्यावर मिठाच्या सत्याग्रहाची आठवण होते. शिरोडय़ात आजही मिठाची उत्पादने घेतली जातात. त्यामुळे वडाच्या झाडाकडे इतिहासरूपी मिठाच्या सत्याग्रहाचे स्मारक व्हावे असे सर्वाना वाटते. आतापर्यंत राजकीय पक्षाच्या नेतृत्वाने अनेक वेळा मिठाचा सत्याग्रहाचे स्मारक उभारण्याची घोषणा केली. शिरोडय़ातील लोकांनी मागणीही केली, पण इतिहासाचे संगोपनाला लोकशाहीत महत्त्व नसल्याचे आता बोलले जात आहे. केंद्र व राज्य सरकारने अथांग सागर किनाऱ्याचे फायदे ओळखले आहेत. त्यांनी सागरी प्रवासी वाहतूक, माल वाहतुकीला प्राधान्य देण्याचे धोरणही आखले आहे. मुंबई विद्यापीठ सागरी अभ्यासक्रमदेखील आणण्याच्या विचारात आहे. या पाश्र्वभूमीवर शिरोडय़ातील मिठाच्या सत्याग्रहाच्या ठिकाणी एखादे स्मारक उभारणे गरजेचे आहे. महात्मा गांधीजीच्या आदेशाने मिठाचा सत्याग्रह या ठिकाणी करण्यात आला. गांधीजींनीदेखील शिरोडय़ातील मिठागरांना भेट दिल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मिठाचा सत्याग्रहाचा ज्वलंत इतिहास स्मारकरूपी उभा करून पर्यटकांना इतिहासाचे दर्शन घडवावे अशी मागणी आहे.