वाशीम जिल्ह्य़ातील आदर्श जिल्हा परिषद शाळेचा ‘नावली पॅटर्न’; सामूहिक प्रयत्नातून शाळेचा कायापालट; यंदा शाळा ‘हाऊसफुल’! विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी आदर्श शाळा कशी असावी असा प्रश्न पडल्यास वाशीम जिल्ह्य़ातील रिसोड तालुक्यातील नावली येथील जिल्हा परिषद शाळा हे उत्तम उदाहरण ठरेल. या शाळेत शिक्षकांकडून विनासुट्टी विद्यार्थ्यांना वर्षांतील ३६५ दिवस शिक्षणाचे धडे दिले जातात. अल्पकालावधीतच शिक्षक व ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नाने या शाळेचा कायापालट झाला. त्यातूनच इंग्रजी माध्यमाच्या संस्कृतीकडे वळणारी पावले नावली जिल्हा परिषद शाळेकडे वळू लागली आणि या वर्षी शाळेवर ‘हाऊसफुल्ल’चा फलक झळकला. राज्यात आदर्श जिल्हा परिषद शाळेचा ‘नावली पॅटर्न’ प्रकाशझोतात आला आहे. शिक्षणच्या खालावलेल्या दर्जातून राज्यातील जिल्हा परिषदेच्या किंवा महापालिका, नगर पालिकांच्या शाळा कालबाह्य़ होत आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेची संस्कृती मोडकळीस निघात आहे. याला काही अपवादही आहेत. असाच अपवाद ठरली आहे वाशीम जिल्ह्य़ातील नावली येथील जिल्हा परिषदेची शाळा. दोन हजार लोकसंख्या असलेल्या नावली गावात गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेची शाळा आहे. काही वर्षांपूर्वी या जिल्हा परिषद शाळेचीही इतर शासकीय शाळेप्रमाणाचे दयनीय अवस्था होती. त्यामुळे गावातील बहुतांश पालक आपले पाल्य गावापासून ३० कि.मी. अंतरावर रिसोड शहरातील शाळेत पाठवत होते. जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची रिक्त पदे असल्याने शाळा वाऱ्यावरच होती. अशा परिस्थितीत ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केल्याने शाळेत पाच शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. गावाच्या आणि शाळेच्या सुदैवाने वर्गमित्र असलेले पाच शिक्षक यानिमित्ताने एकत्र आले. त्यासाठी त्यांनी स्वत: जवळील पसे गोळा केले. शिक्षकांच्या या विधायक कार्याला गावकऱ्यांनीही एकदिलाने साथ देऊन वर्गणी गोळा केली व या कार्यात अनमोल वाटा उचलला. जमा झालेल्या पशांमधून शाळेचा कायापालट करण्यात आला. शाळेची रंगरंगोटी, मुलभूत सोयीसुविधा करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपयुक्त अशा अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात आल्या. भौतिक सुविधांची व्यवस्था झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी लक्ष्य केंद्रित करण्यात आले. या शिक्षकांनी एकही सुट्टी न घेता वर्षभर ३६५ दिवस विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचे अनमोल कार्य केले. ३६५ दिवस चालणारी केवळ वाशीम जिल्ह्य़ातीलच नव्हे तर, राज्यातील ही एकमेव शाळा ठरली आहे. विद्यार्थ्यांना साध्या व सोप्या भाषेत वर्षभर वेगवेगळ्या उपक्रम राबवून शिक्षणाचे धडे दिले जातात. या शाळेत इयत्ता पहिली ते आठवीवीपर्यंत वर्ग आहेत. गेल्या वर्षी या शाळेची १४५ पटसंख्या होती. शाळेची नावलौकिकता वाढल्यामुळे आता पटसंख्या ही तब्बल ४००च्या पुढे गेली आहे. मर्यादित क्षमतेमुळे आता प्रवेश देणे शक्य होत नाही. त्यामुळे आता एखाद्या नामांकित खासगी शाळेप्रमाणे या जिल्हा परिषद शाळेवर ‘हाऊसफुल्ल’चा फलक लावला आहे. पाच शिक्षकांचे परिश्रम आणि त्याला गावकऱ्यांची मिळालेली साथ यामुळे एका वर्षांत या शाळेच रूपडं पालटलं. १शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक नारायण गारडे, सहकारी शिक्षक कृष्णा पल्लोड, सुभाष सदार, राहुल साखरेकर, विनोद झनक, अजय झनक यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीने शाळेत व्यापक परिवर्तन आणण्याचा निर्धार केला. या शिक्षकांनी स्वत:चा एक महिन्याचा पगार देऊन तब्बल दीड लाख रुपये जमा केले. गावातून पाच लाख रुपये लोकवर्गणी जमा करून शाळेला एक नव रूप दिले. २या शाळेमध्ये इन्व्हर्टरची व्यवस्था केली आणि दररोज सायंकाळी ७ ते ९ यावेळेत गावातील टीव्ही बंद कार्यक्रम शाळेच्या माध्यमातून राबविण्यात येतो. या काळात पालक आपल्या पाल्यांना घेऊन या ठिकाणी अभ्यास करून घेतात. अख्खी शाळा डिजिटल झाली असून विद्यार्थी नियमित धडे गिरवतात. ३नावली येथील शिक्षकांनी गत वर्षीपासून अनोखे उपक्रम राबविले तसेच पालकांचा विश्वास संपादन केला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेला स्वत:ची शाळा समजून विद्यार्थ्यांना नियोजित वेळे व्यतिरिक्तही शिक्षकांनी ज्ञानदान केले. उन्हाळ्यातही सुट्टी न घेता सकाळच्या सत्रात गणित, विज्ञान, भाषा व अन्य विषयांचे वर्ग घेतले. या सर्व सकारात्मक प्रयत्नांमुळे आज ‘प्रवेश बंद’चे फलक लावण्याची वेळ आली आहे. इतर शाळेत ‘पॅटर्न’ राबविण्याचा निर्धार नावली येथील जिल्हा परिषद शाळा इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असून, या शाळेचा पॅटर्न अन्य जिल्हा परिषद शाळेत राबविण्याचा निर्धार वाशीम जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे. नावली जिल्हा परिषद शाळेतही अनोखे उपक्रम राबविल्याने आणि शाळेत आवश्यक त्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध झाल्याने या वर्षी नावली येथे अन्य ठिकाणाची एकही स्कूल बस विद्यार्थी घेण्यासाठी येत नाही. नावलीचा हा उपक्रम जिल्हय़ातील अन्य जिल्हा परिषद शाळांनी राबविल्यास जिल्हा परिषद शाळांवर पालकांचा विश्वास बसेल, अशी अपेक्षा आहे. संगणक प्रयोगशाळेची गरज २०१६ मध्ये आम्ही शिक्षकांनी एकत्र येत शाळेत परिवर्तन घडवण्याला सुरुवात केली. गावकरयांची अनमोल साथ मिळाली, त्यामुळे हे शक्य झाले. लोकवर्गणीतून शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्वसुविधा पुरवण्यात येत आहेत. प्रशासनाकडूनही सहकार्य मिळते. आता विद्यार्थाना संगणक प्रयोगशाळेची गरज आहे. - नारायण गारडे, प्रभारी मुख्याध्यापक