दुष्काळाच्या प्रश्नी काँग्रेसतर्फे आसूड मोर्चा काढण्याची घोषणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी बुधवारी लातुरात केली. त्याची अंमलबजावणी लातुरात दुसऱ्याच दिवशी करण्यात आली. आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बलगाडय़ा, गायी, म्हशींसह कार्यकत्रे दाखल झाले.
राष्ट्रवादीच्या वतीने राज्यभर तहसील कार्यालयावर सोमवारी (दि. १४) जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर राष्ट्रवादीने आक्रमक धोरण घेतल्याने काँग्रेसनेही जोरदार हालचाली करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर अचानक मोर्चा काढला. मात्र, या मोर्चाची प्रशासनाला कल्पना नसल्यामुळे अपुरा बंदोबस्त होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बलगाडय़ा व जनावरे नेत असताना त्यांना थांबविणे यंत्रणेला अवघड गेले. आमदार अमित देशमुख व त्र्यंबक भिसे, जि. प. अध्यक्षा प्रतिभा पाटील कव्हेकर, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील सेलूकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष एस. आर. देशमुख यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोर्चात मोठा सहभाग होता.