खडसे यांचा कार्यकर्ता मेळाव्यात घणाघात

मंत्रिपदाची मी पर्वा करत नाही, पण माझी बदनामी हे ठरवून केलेले कृत्य आहे. विरोधी पक्षांनी आरोप केले नाहीत, तर अंजली दमानिया, प्रीती मेनन यांना पुढे केले गेले. या सर्व घडामोडींमागे कोण आहे हे माहीत असले तरी मी आत्ता बोलणार नाही. अनेक गुपिते त्यामागे दडली आहेत. आपण तेव्हा गुपिते उघड केली असती तर संपूर्ण देश हादरला असता, असे घणाघाती विधान भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी नाशिक येथे कार्यकर्ता मेळाव्यात केले.

मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर महिनाभरात आपले कोण आणि परके कोण हे कळले आहे. हा नाथा संपणारा नसून संपविणारा आहे. त्यामुळे पक्षात राहून जे आरडाओरड करीत आहेत, त्यांचा आधी समाचार घेतला पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना ‘मार्गदर्शन’ करताना स्वकीयांविरोधात प्रथमच तोफ डागली. संतप्त कार्यकर्त्यांनी अन्य नेत्यांना बोलूच दिले नाही.  त्यामुळे त्यांची भाषणे त्रोटकच झाली. खडसे म्हणाले की, आपला कोण, परका कोण हे आता ओळखले पाहिजे. पक्षात राहून जो पक्ष नेतृत्वाशी गद्दारी करत असेल त्याला संपविले पाहिजे.

लवकरच जाहीर करीन!

माझ्यावर वार करीत आहेत त्यांच्यामागे खरे कोण आहेत, याचा खुलासा लवकरच केला जाईल, असे जाहीर करीत खडसे यांनी स्वपक्षातील विरोधकांना सूचक इशारा दिला. लोकांना सर्व माहीत असते. या सर्वातून आपण बाहेर येणार आहोत. सीतेलाही अग्नीपरीक्षा द्यावी लागली होती. महाभारतात पितामह भीष्म यांना हरविता येत नव्हते, तेव्हा शिखंडीला पुढे यावे लागले, असे ते म्हणाले.