एकनाथ खडसे यांचे मत

‘वंदे मातरम्’ या शब्दात मोठी ऊर्जा आहे. वंदे मातरम् न म्हणण्याची भूमिका मुस्लीम समुदायाची नाही, परंतु काही बोटावर मोजण्याइतपत समाजकंटक धर्माच्या आड येऊन जातीय सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करतात, असे मत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.

येथे विजय वाघमारे लिखित ‘सिमी: दी फर्स्ट कनव्हिक्शन इन इंडिया’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी खडसे यांनी भारतात जन्म घेऊन संपूर्ण जीवन भारतातच व्यतीत करणाऱ्यांना वंदे मातरम् म्हणायला काय हरकत आहे, असा प्रश्न उपस्थित केला. आपण पहिल्यांदा जळगावमध्ये निघालेल्या राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या मोर्चात सिमी या देशद्रोही संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यामुळे आपणास धमक्याही देण्यात आल्या होत्या. सिमी असो वा आयसिस, आपण कोणाच्याही धमकीला घाबरत नाही, असे खडसे यांनी सांगितले. सिमीवर पुस्तक लिहिणे ही मोठी धाडसी वृत्ती आहे. सिमीवर लिखाणाचे धाडस करणे हीच मोठी गोष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या वेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सिमी खटल्याचे सूत्र जळगाव जिल्ह्य़ातून हलत होते हा जिल्ह्य़ासाठी मोठा धक्का होता, असे मांडले. सिमी खटल्याबाबत सखोल माहिती पुस्तकात मांडण्यात आली असून या लिखाणातून सर्वसामान्यांना सिमी खटल्याचा उलगडा होऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक पत्रकार शेखर पाटील यांनी केले. या वेळी आ. चंद्रकांत सोनवणे, राजुमामा भोळे, पुण्याच्या अभिनव प्रकाशनचे प्रतिनिधी समीर दरेकर, अॅड. केतन ढाके, विष्णू भंगाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव पाटील, सिमी खटला चालविणारे अॅड. के. डी. पाटील आदी उपस्थित होते.