शेतकऱयांकडे मोबाईलचं बील भरायला पैसे असतात, मग ते वीजेचं बील का भरत नाहीत? असा खोचक सवाल राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसेंच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत कारण, सत्तेत येण्याआधी विरोधी पक्षनेते असणारे हेच एकनाथ खडसे शेतकऱयांना वीज बील माफ करा अशी मागणी करत होते मात्र सत्तेत आल्यानंतरच्या या वक्तव्यामुळे त्यांचा सूर बदलल्याचे दिसून आले. अकोल्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मोबाईलचं कनेक्शन तुटू नये म्हणून तुम्ही जर हजार रुपयांचे बील भरता मग, वीजबील का भरत नाही असा सवाल त्यांनी शेतकऱयांना विचारला. शेतकऱयांकडे पैसे नाहीत हे आपल्याला पटत नाही. फारतर वीजबिलात सवलत देऊ, पण ते माफ करणार नाही, असेही खडसे पुढे म्हणाले.