पाणी भरण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी तालुक्यातील रामपुरा गावात घडली. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आशाबाई भाऊसाहेब करांडे (११) आणि मन्याबाई काळू गोयकर (१०) अशी या दोन मुलींची नावे आहेत.  रामपुरा शिवारातील शेतात वास्तव्यास असणाऱ्या या मुली सकाळी दहाच्या सुमारास पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेल्या होत्या. त्या वेळी एकीचा तोल जाऊन ती पाण्यात पडली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरीही पाण्यात पडली.  या घटनेची माहिती समजल्यानंतर आसपासच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले; परंतु तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले होते.