लग्नानंतर प्रियकराशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या कारणावरुन वडिलांनी आपल्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यात घडली. मुलीची निघृण हत्या केल्यानंतर आरोपी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. यापूर्वी धरणगाव तालुक्यात अनैतिक संबंधाच्या रागातून एका पित्याने स्वत:च्या मुलीची हत्या केल्याची घटना घडली होती.

जळगाव शहरापासून जवळ असलेल्या दोनगाव बुद्रुक येथील विश्वास पीतांबर पाटील याची मुलगी दिपालीचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. लग्नानंतरही तिने आपल्या पूर्वीच्या प्रियकराशी संबंध कायम ठेवले होते. विवाहापूर्वी गावातीलच एका तरुणाशी तिचे प्रेमसंबंध होते. लग्नानंतर दिपाली त्या तरुणीसोबत पळून देखील गेली होती. वारंवार समजावून देखील ती ऐकत नव्हती. तिच्या या वागण्यामुळे समाजात बदनामी होत असल्याच्या संतापातून वडिलांनी मुलीची हत्या केली.  घरातील सर्व मंडळी झोपलेले असताना बुधवारी रात्रीच्या सुमारास सुताच्या दोरीने झोपेतच आरोपीने दिपालीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपी पित्याने स्वत:हून घडलेला  सर्व प्रकार दोनगावच्या पोलीस पाटलांना सांगितला. पोलीस पाटील त्याला पाळधी पोलीस ठाण्यात घेऊन गेले. पोलिसांकडेही त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.