कृषिजन संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेला ‘बैल’ हा श्रमसंस्कृतीचे मूर्तिमंत प्रतीक. भारतीय लोककलेत आणि साहित्यातही त्यांची विविध रूपे आढळतात. अर्थात कवितेतून हा रसिकांना भेटणाऱ्या या बैलाने आता नाटय़ाविष्कारातून रंगमंचावर एंट्री घेतली आहे. हिंदी, दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटातील विख्यात अभिनेते सयाजी शिंदे यांची कलानिर्मिती असलेला हा नाटय़ाविष्कार ‘बैल : अ-बोलबाला’ या नावाने शनिवार २० रोजी सातारा येथे रंगमंचावर प्रथम सादर करण्यात आला. बहिणाबाई, भालचंद्र नेमाडे ते वसंत सावंत, अजय कांडर आदी मराठीतील नामवंत १३कवींच्या बैलावरच्या कवितांचा हा नाटय़ाविष्कार आहे. लोकरंगमंच या संस्थेची निर्मिती आणि राजीव मुळ्ये यांचे दिग्दर्शन, लेखन असलेल्या या ‘बैल : अ-बोलबाला’ नाटय़ाविष्काराचा सहा महिन्यांच्या अथक सरावानंतरचा पहिला प्रयोग सातारा येथे शनिवार, २० रोजी संपन्न झाला. त्यावेळी नाटय़ाविष्कारातील कवींबरोबरच नाटय़, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘बैल : अ-बोलबाला’ नाटय़ाविष्कारातील कवींच्या काव्यमैफिलीचेही आयोजन यावेळी करण्यात आले. दरम्यान ‘बैल : अ-बोलबाला’ नाटय़विष्कारात सिंधुदुर्गातील कवी वसंत सावंत, अजय कांडर यांच्या बहिणाबाई, कवी यशवंत, बरोबरच बहिणाबाई भालचंद्र नेमाडे, नारायण कुलकर्णी-कवठेकर, विठ्ठल वाघ, लोकनाथ यशवंत, प्रकाश होळकर, जगदीश कदम, सायमन मार्टीन, कल्पना दुधाळ, भरत दौडकर, श्रीकांत ढेरंगे, थळेंद्र लोखंडे यांच्या ‘बैल’ या विषयावरील कवितांचा समावेश आहे. नृत्य, नाटय़, संगीत काव्याविष्कार असलेल्या या कार्यक्रमाची माहिती नाटय़ प्रयोगापूर्वी नाटय़रसिकांना देताना लोकरंगमंचचे तुषार भद्रे म्हणाले, लोकरंगमंचचे संस्थापक सदस्य, प्रसिद्ध नाटय़ प्रशिक्षक सुनील कुळकर्णी यांनी महाराष्ट्रातील या दिग्गज कवींच्या बैलावरच्या कविता संकलित केल्या होत्या. त्यांचा रंगमंचीय आविष्कार करण्याचा मानस होता. त्याच उद्देशाने सयाजी शिंदे यांच्याकडे त्या दिल्या होत्या. पण सयाजी हे हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटात व्यस्त असल्याने हा उपक्रम मागे पडला. मात्र, कुळकर्णी यांचे अकाली निधन झाल्याने आता शिंदे यांच्या संकल्पनेतून हा ‘बैल : अ-बोलबाला’ नाटय़ाविष्कार रंगमंचावर येत आहे. नाटय़ाविष्कारातील सर्वच कविता निव्वळ बैलावरील नाहीत. बैल हे रूपक असून माणूस माणसावर भाष्य केलेल्याही कविता आहेत. त्यातच दोन कवितांमधून आशय, अर्थ लक्षात घेऊन त्याची संगती लावून नाटय़ उभे करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिग्गजांनी शब्दांच्या माध्यमातून कवितेत आणलेला बैल आणि त्यातून उभे राहिलेले नाटय़ हा २८ कलावंतांनी केलेल्या या प्रयोगाचा आत्मा आहे. सयाजी शिंदे म्हणाले, बैल हा श्रमसंस्कृतीचा अ-बोलबाला आहे. झपाटय़ाने ही संस्कृती लयाला जाऊन कष्टाची किंमतच राहिली नाहीय. बैल हे या संस्कृतीचे प्रतीक आहे. त्याच्यावर लिहिल्या गेलेल्या एकत्र कविता वाचताना त्याची जाणीव होते. म्हणूनच आजच्या काळात असा प्रयोग आवर्जून करावासा वाटला.