नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून मंगळवारी सकाळी पाच सराईत गुन्हेगारांनी पोबारा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तुरूंगाचे गज कापून सकाळी ७.३० वाजल्याच्या सुमारास पाच आरोपी कारागृहातून पळाले. पळालेले आरोपी राजा गवस टोळीचे सदस्य असून या पाच जणांपैकी तिघांवर मोका कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल आहेत. आरोपींवर प्रत्येकी २० ते २५ गुन्हे दाखल असून पाचही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. घटनेची माहिती मिळताच नागपूर पोलिसांनी शहराची नाकेबंदी केली आहे. मात्र, अद्याप एकाही आरोपीला पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीचे वाढते प्रमाण कळीचा मुद्दा असताना आता कडेकोट बंदोबस्त असलेल्या कारागृहातून आरोपी पळाल्याच्या प्रकरणामुळे सरकार आणखी गोत्यात सापडण्याची दाट शक्यता आहे.