मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रसायनीजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार तर दोघे जखमी झाले. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर मंगळवारी पहाटे पाच ते साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने तवेराला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला.
तवेरा गाडी चिपळूणहून पुणे मार्गे मुंबईच्या दिशेने येत होते. रसायनीजवळ आली असताना भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने तवेरा गाडीला मागून जोरदार धडक दिली. यात तवेरातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले.
गंगाराम गोविंद रावण (वय ६५), संदीप गंगाराम रावण(वय३५), संजय आत्माराम रावण(वय ४०), जयराम हरी आंबेकर (वय ५०) आणि तवेराचे चालक मिलिंद रघुनाथ पवार (वय २५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुनील शंकर रावण आणि संतोष राघू रावण हे दोघ गंभीर जखमी झाले. दोघांवर नवी मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक डी. एस. तेलगोटे पुढील तपास करत आहेत.