‘साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा’ अशी आपल्याकडे म्हण आहे. पेण तालुक्यातील बरडावाडीतील आदिवासी मात्र ‘राज्यपाल येती घरा तोचि दिवाळी दसरा’ असे म्हणू लागले आहेत. राज्यपालांच्या दौऱ्याच्या नुसत्या चच्रेनेच सध्या बरडावाडीत लगीनघाई सुरू आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव पुढच्या आठवडय़ात रायगड जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा सध्या जिल्ह्य़ात सुरू आहे. अधिकृत दौरा जाहीर झाला नसला तरी प्रशासन गेल्या १५ दिवसांपासून कामाला लागले आहे. आपल्या दौऱ्यात राज्यपाल पेण तालुक्यातील बरडावाडी या आदिवासी वस्तीला भेट देऊन तेथील ग्रामस्थांनी फुलवलेल्या भाजी-मळ्यांची पाहणी करणार आहेत असे सांगितले जाते. या पाश्र्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी सुरू आहे.मुंबई-गोवा महामार्गापासून अवघ्या काही अंतरावर असलेली पाबळ खोऱ्यातील बरडावाडी ही १०० घरांची वस्ती. आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेली ही वस्ती आता चच्रेत आली आहे. कधी गावाचं तोंडही न पाहिलेले अधिकारी फेऱ्या मारू लागलेत. गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांची डागडुजी सुरू आहे. पायवाटाही गाडय़ा जातील इतक्या मोठय़ा झाल्यात. गावात रंगरंगोटी सुरू आहे. पण इथल्या आदिवासींना अनेक समस्या भेडसावताहेत. आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन अनेक योजना राबवते. परंतु आरोग्य, घर, पाणी या प्राथमिक सुविधाही सर्वाना मिळत नाहीत. गेले कित्येक वष्रे अनेकांकडे साधे रेशनकार्ड नव्हते. राज्यपाल येणार म्हणून घाईघाईने ती पुरवण्यात आली.गावात शिरतानाच काही आदिवासी भगिनींची भेट झाली. सुरुवातीला लाजणाऱ्या या महिलांनी नंतर तोंड उघडले आणि भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. गेले कित्येक महिने आमच्याकडे रेशनकार्डच नव्हते, ते आजच मिळाले. आता आम्ही रेशनदुकानावर धान्य आले आहे का? ते पाहायला निघालो आहोत, असे िपकी पवार हिने सांगितले. जानकी वाघमारे या वयोवृद्ध महिलेने गावात घरकुल, गावठाण, पाण्याच्या समस्या आहेत. माझे केस पांढरे झाले परंतु आतापर्यंत कुणीही लोकप्रतिनिधींनी आमच्या वस्तीवर भेट दिली नाही, असे सांगितले. कधीही न फिरकणाऱ्या अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी गावात पायधूळ झाडली. आता बरडावाडीचे रूपडे पालटतंय. त्यामुळे आदिवासी आनंदित झालेत. पण त्यांचा हा आनंद औटघटकेचा राहू नये, एवढी अपेक्षा करायला हरकत नाही.