पश्चिम महाराष्ट्रात बळीराजासह सर्वसामान्य सुखावले यंदाचे पाऊसमान उत्तम राहिल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण असून, शिवार बहरल्याने बळीराजा सुखावला आहे. तर, पीकपाणी उत्तम राहणार असल्याने जीवनावश्यक वस्तूंचे भाव उतरतील या आशेने सर्वसामान्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. पावसाने सरासरी ओलांडल्याने ठिकठिकाणचे जलसाठेही तुडुंब भरले असून, त्यातून वीजनिर्मिती व सिंचनासाठी पाण्याचा वापर सक्षमपणे सुरू आहे. तुलनेत पावसाने उत्तम कामगिरी साधल्याने शेतमाल मुबलक उपलब्ध होईल असे सर्वत्र चित्र आहे. गतवर्षी मात्र, आजमितीला पावसाची टक्केवारी अगदीच घसरलेली राहिल्याने सर्वत्र चिंतेचे ढग होते. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दुष्काळी भागाचा दौरा करून, राज्यात सर्वत्र दुष्काळ स्थिती असून, पश्चिम महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. मराठवाडय़ात तर, जरूर कृत्रिम पावसाचे प्रयोग करणे आवश्यक ठरेल. हा दुष्काळ १९७२ ची आठवण करून देणारा असल्याचे मत पवारांनी व्यक्त केले होते. यंदा मात्र सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्याने दुष्काळ आणि पाणी टंचाई यांची चर्चाच विसावली आहे. सध्या अपवाद वगळता सर्व धरणे शिगोशिग भरून वाहिली. त्यात सर्वाधिक पाणीसाठय़ाचे कोयना धरणही भरून वाहिले. त्यामुळे कृष्णा, कोयना नद्यांकाठी पाण्याचा सुकाळ राहणार असल्याने शेतकऱ्यांबरोबरच जनसामान्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परिणामी गौरी, गणपती व पाठोपाठ येणारी दिवाळीही दणक्यात साजरी होईल असेच म्हणावे लागत आहे. कोयना धरणक्षेत्रात एकूण सरासरीच्या ९१ टक्के पाऊस झाला आहे. पावसाळय़ाचा उर्वरित कालावधी आणि घोडा, हस्त (हत्ती) व उंदीर नक्षत्र कितपत बरसते याकडे नजरा आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील धरणांचा पाणीसाठा टीएमसीमध्ये व त्याची कंसात टक्केवारी - कोयना १०३.०८ (९७.९६), वारणा ३४.२१(९९.४५), राधानगरी ८.२५ (९८.६२), दूधगंगा २३.९६ (९४.३७), धोम १३.०७ (९६.८०), कण्हेर ९.८४ (९७.४०), धोम-बलकवडी ४.०१ (९८.१८), उरमोडी ९.७२ (९७.५०), उत्तरमांड ०.५८(६७.०५), तुळशी ३.४६ (९९.७१), तारळी ५.१९(८८.७४), वीर ९.४१ (१००), नीरा-देवघर ११.७३ (१००), भाटघर २३.५० (१००), गुंजवणी २.१६ (१००), खडकवासला १.९७ (१००), पानशेत १०.६५ (१००), वरसगाव १२.८२(१००), टेमघर ३.२६ (८८), मुळशी १८.४६(१००), डिंभे १२.२४(९८), चासकमान ७.५७(१००), पवना ८.५१(१००), घोड ४.५०(८२.४२), कळमोडी १.५१(१००) तर सोलापूर जिल्ह्य़ातील उजनी धरणात ३२.९५ (६१.५०) असा पाणीसाठा आहे.