हिंगोली जिल्हा परिषद निवडणुकीत आयाराम-गयाराममुळे रंगत वाढली आहे. निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळण्यासाठी पक्षांतर करणाऱ्यांमुळे पक्षनेत्यांची अडचण झाली आहे. भाजप-शिवसेनेतील नेते एकमेकांवर आरोप-प्रतिआरोप करून तोंडसुख घेण्याचे उद्योग करीत आहेत, तर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडी करण्याचे गुऱ्हाळ अद्यापही सुरूच आहे. आतापर्यंतचा पूर्वेतिहास पाहता राष्ट्रवादी-शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी, काँग्रेस-शिवसेना यांच्यात जिव्हा परिषदेवर सत्तेसाठी युती झाली. मात्र, शिवसेनेला एकहाती सत्ता मिळाली होती. ५० सदस्य संख्या असलेल्या सभागृहात शिवसेनेचे २६ सदस्य होते. राष्ट्रवादी काँग्रेस ११, काँग्रेस ९, अपक्ष निवडून आलेल्या ४ मधील तीन काँग्रेससोबत तर एक शिवसेनेसोबत होता. एकहाती सत्ता असताना जिल्हा परिषदेमध्ये सत्ताधाऱ्यांना समन्वय साधता आला नाही. सभागृहातील अनुभवी जि. प. सदस्यांसमोर अनेक प्रकरणात सत्ताधाऱ्यांनी नांग्या टाकल्याचे चित्र पाहायला मिळाले. केंद्र व राज्य शासनाकडून आलेला कोटय़वधींचा निधी सत्ताधाऱ्यांना खर्च करता आला नाही. त्यामुळे सत्ताधारी विकास कामाचा प्रचार कोणत्या तोंडाने करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर व माजी आमदार गजानन घुगे यांच्यात वर्चस्वासाठी संघर्ष आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध कोणी काम केले, यावर आता कार्यकत्रे खुलेआम बोलू लागले आहेत. गेल्या सभागृहात भाजपाचा एकही सदस्य नसताना भाजपला यावेळी बहुमताची स्वप्ने पडू लागली आहेत. भाजपाचे जिल्हा परिषदेंतर्गत विकासाचे कोणतेच काम नाही. झालेल्या नगरपालिका निवडणुकीत िहगोलीचा नगराध्यक्षवगळता या पक्षाला जिल्ह्य़ात सपाटून मार खावा लागला आहे. नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीसच्या नावावर विजयी झालेल्या आमदारांनी जुन्या मंजूर कामांना आपणच निधी आणला, हे ओरडून सांगण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यातूनच िहगोली शहरातील भूमिगत गटार योजनेचा मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणारा भूमिपूजन कार्यक्रम बारगळला. दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचे प्रयत्न काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणूक युती होण्यासाठी काँग्रेसचे खासदार राजीव सातव, आमदार संतोष टारफे, माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, राष्ट्रवादीकडून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार रामराव वडकुते, पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांच्यात चच्रेच्या दोन बठका झाल्या. दोन्हीकडील नेते युतीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत सुटले आहेत. परंतु कळमनुरी तालुक्यातील खरवड व सेनगाव तालुक्यातील बाभुळगाव हे दोन गट आपल्याच पक्षाला मिळावे यावरील चच्रेला मात्र अद्याप पूर्णविराम मिळाला नाही. आमदार वडकुते खरवड गट आपल्या मुलासाठी तर केशव नाईक यांच्यासाठी खासदार सातव या गटासाठी आग्रही आहेत. भाऊ पाटील गोरेगावकर यांची अद्याप युतीच्या संदर्भात भूमिका स्पष्ट झाली नाही. त्यामुळे आघाडीचा निर्णय अनिश्चित असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहाची संख्या ५० होती. ती आता ५२ वर गेली आहे. राजकीय पक्षाच्या ताकदीचा विचार करता वसमतमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीची ताकद आहे. कळमनुरीत काँग्रेस व शिवसेनेची तर िहगोली, सेनगावमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीची ताकद आहे. गेल्या निवडणुकीत गजानन घुगे, आमदार जयप्रकाश मुंदडा, जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या पाठीशी कोणताही शिवसेनेचा नेता नसताना जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता मिळविली होती. परंतु आता शिवसेनेत अनेकांनी प्रवेश केल्याने उमेदवारी वाटपावरून नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. तसेच भाजपामध्येसुद्धा अनेकांनी उमेदवारीच्या भरवशावर प्रवेश केल्यामुळे नर्सी नामदेव, भानखेडा, आजेगाव यासारख्या जि. प. गटात उपऱ्यांना संधी मिळणार असल्याने निष्ठावंत धास्तावले आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश आले नाही. परंतु यावेळी ग्रामीण भागात नोटाबंदीचा परिणाम दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर काँग्रेसने वारंवार आंदोलने केली. खासदार राजीव सातव, आमदार संतोष टारफे, माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर हे मात्र यावेळी जिल्हा परिषदेवर कोणत्याही परिस्थितीत सत्ता आणण्यासाठी प्रयत्नाला लागले आहेत. गरज पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्याची त्यांची मनोमन तयारी झाल्याचे चित्र आहे. अनेकांनी उमेदवारीच्या भरवशावर शिवसेनेत प्रवेश केला आहे. वसमतचे आमदार जयप्रकाश मुंदडा हे मात्र कोणत्याही परिस्थितीत मतदारसंघात शिवसेनेचा गढ राखण्यासाठी कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार रामराव वडकुते, मुनीर पटेल हेसुद्धा यावेळी काँग्रेससोबत युती करून जिल्हा परिषदेची सत्ता मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मावळत्या सभागृहात एकही सदस्य नसताना भाजपाचे आमदार तान्हाजी मुटकुळे जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचे स्वप्न पाहत असले तरी त्यांच्यातील निष्ठावान व उपऱ्यातील वाद चांगलाच गाजत आहे. सुराज्यपर्व रथयात्रेत गोंधळ निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी केंद्र व राज्य सरकारने आतापर्यंत केलेल्या विविध विकास कामाची माहिती ग्रामीण भागात पोहचविण्यासाठी सुराज्यपर्व रथयात्रा काढली होती. परंतु माजी आमदार बळीराम पाटील कोटकर यांच्या भानखेडा येथे यात्रा पोहचल्यानंतर खुद्द बळीराम पाटील यांची कार्यक्रमाला अनुपस्थिती होती. आमदार महोदयांकडून बाहेरचा उमेदवार लादण्यात येत असल्याने कोटकरांना आमदारांचा निर्णय मान्य नाही, असे कार्यकर्ते सांगतात. मुटकुळे यांची सुराज्यपर्व रथयात्रा गोरेगाव येथे पोहचली असता त्या ठिकाणच्या ग्रामस्थांनी शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. या कार्यक्रमात मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून गोंधळ घातल्याने आमदार मुटकुळे यांना हा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. या गावातून त्यांची सुराज्यपर्व रथयात्रा माझोड गावी गेली असता येथेसुद्धा असाच काही प्रकार घडल्याने भाजपच्या सुराज्यपर्व रथयात्रेच्या कार्यक्रमाला गालबोट लागल्याची चर्चा सर्वत्र आहे.