बीड जिल्ह्यातील माजलगावजवळील टालेवाडी येथे वडिलांनी दोन मुलांची जाळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुंदन वानखेडे असे या निर्दयी पित्याचे नाव आहे. मुलांना जाळून मारल्यानंतर तो फरार झाला आहे. गुरुवारी सकाळी हा सर्व प्रकार उघडकीस आला. वैष्णव वानखेडे (वय २) आणि बलभीम वानखेडे (वय ४) अशी या घटनेत मृत झालेल्या मुलांची नावे आहेत. कुंदन हा शेतकरी आहे. कुंदन आणि त्याच्या पत्नीमध्ये काहीकारणास्तव वाद होते. त्यामुळे पत्नी त्याच्यापासून विभक्त राहत होती. दोंघाच्यातील वाद न्यायालयापर्यंत पोहोचला होता. दोन दिवसांनी न्यायालयात सुनावणी होणार होती.  कुंदन आणि त्याच्या पत्नीतील वादामुळेच त्याने मुलांचा जीव घेतला, अशी चर्चा परिसरात रंगत आहे.

कुंदन वानखेडे याने बुधवारी रात्री आपल्या  बलभीम व वैष्णव या दोन मुलांना जिवंत जाळले. घटनेनंतर आरोपी कुंदन घराचे दार बाहेरून बंद करुन फरार झाला. कुंदन वानखेडे याचा विवाह तालुक्यातीच श्रृंगारवाडी येथील रेखा हिच्याशी झाला होता. गेल्या सहा महिन्यांपासून पासून पती-पत्नीत वाद सुरु झाले. त्यानंतर  रेखा ही एकटीच माहेरी राहत होती. तर कुंदन दोन्ही मुलांसह टालेवाडी येथील शेतातील घरात राहात होता. मध्यरात्री कुंदन वानखेडेने गाढ झोपेत असलेल्या मुलांना जिवंत पेटवून दिले. त्यानंतर घराला बाहेरुन कुलूप लावून तो पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.