कोकणातील आगामी नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी गुरूवारी चिपळूणमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले. जिल्ह्याच्या राजकारणात माझ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत यावेळी भास्कर जाधव यांनी यापुढे जिल्ह्याचे नेतृत्त्व करणार नसल्याचे जाहीर केले. माझ्या कार्यकर्त्यांना पदे दिली जात नाहीत. त्यांच्यावरचा अन्याय सहन होत नसल्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे जाधव यांनी सांगितले. मी माझ्या लोकांना- कार्यकर्त्यांना सोडून कुठेही जाणार नाही. पण माझ्या कार्यकर्त्यांवरील अन्याय मी आणखी किती सहन करू. मी कुठेही जाण्याचा विचार केला नाही, करणार नाही, पण माझ्या कार्यकर्त्याला पक्षात न्याय मिळत नसल्याने मी नाराज आहे, असे भास्कर जाधव म्हणाले. शिवसेना विरुद्ध राणे लढाईचा पुढील अंक.. आगामी निवडणुकीत माजी आमदार रमेश कदम यांच्याकडे पक्षश्रेष्ठींनी निवडणुकीची सर्व सूत्रे सोपवल्यामुळे त्यांचे पक्षांतर्गत कट्टर विरोधक व जिल्हा प्रभारी भास्कर जाधव आणि जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी संपूर्ण जिल्ह्य़ाच्या उमेदवार निवड प्रक्रियेतून अंग काढून घेतले होते. दोनच दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी व काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपचा रस्ता पकडला. याशिवाय, भास्कर जाधव यांच्या निवडक कट्टर समर्थकांनी शिवसेनेमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला होता. त्यापैकी गटनेते मोहन मिरगल यांना लगेच सेनेतर्फे उमेदवारीची बक्षिसीही देण्यात आली आहे. मात्र स्वत: जाधव यांनी, आपण आपल्या जागी ‘स्थिर’ असल्याचे स्पष्ट केले होते. पक्षवाढीसाठी काहीही न केलेल्यांना उमेदवार निवडीचे अधिकार दिल्याबद्दल जाधव यांचे समर्थक असलेले माजी सभापती चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मागील नगर परिषद निवडणुकीत जाधव यांच्या आशीर्वादाने स्थापन झालेल्या शहर विकास आघाडीच्या बॅनरखाली उमेदवार उभे करण्यात आले होते. त्यापैकी त्यांचे चिरंजीव समीर यांच्यासह पाच जण निवडून आले. चिपळूण नगर परिषदेत मागील निवडणुकीत २८ जागांपैकी काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने २० जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले. भास्कर जाधवांचे सैन्य शिवसेनेच्या तंबूत