जीवनात संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे, संस्कार घडले तरच संस्कृती टिकेल आणि त्यातूनच समाज व देश उभा राहील. त्यासाठी संतांचे थोर विचार आचरणात आणण्याची गरज आहे. असे प्रतिपादन रोह्याचे नगराध्यक्ष अवधूत तटकरे यांनी रोहा तालुका चर्मकार संघटना व रोहा अष्टमी संत रोहिदास समाज विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले नगर, रोहा येथे आयोजित संत रोहिदास जयंती उत्सवात केले. या वेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष समीर शेडगे, सरचिटणीस सुरेश नांदगांवकर, जिल्हा संघटक नंदू तळकर, विभागीय अध्यक्ष परशुराम तळकर, जिल्हा उपाध्यक्ष दीपक आंबडकर, शहर अध्यक्ष संतोष पेणकर, जिल्हा प्रतिनिधी विद्या रोहेकर आदी मान्यवर उपस्थित होते. अवधूत तटकरे यांनी काबाड कष्ट करणाऱ्या चर्मकार समाजाची विकासात्मक कामे, स्टॉलचे प्रश्न मार्गी लावू, असे सांगतानाच संत रोहिदास जयंती उत्सवासाठी पालिकेकडून देण्यात येणाऱ्या निधीच्या रकमेत यंदापासून वाढ केल्याचे जाहीर केले. सुरेश नांदगांवकर, नंदू तळकर यांनी मानवता धर्म, संस्कारांचे मूल्य, आई-वडिलांची सेवा, धर्मगुरूंचे विचार आदींसह संत रोहिदास महाराजांचे मौलिक विचार व्यक्त करीत स्पर्धात्मक जीवन आणि संघटितपणाचे महत्त्व विशद केले. सभापती श्रद्धा पाटणकर यांनी संत रोहिदासांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकले. जयंती उत्सव सोहळ्याचे औचित्य साधून रोहा अष्टमी संत रोहिदास समाजाकरिता सुमती सीताराम अष्टीवकर यांच्या स्मरणात बांधण्यात येणाऱ्या नूतन समाज कार्यालयाचे भूमिपूजन नगराध्यक्ष अवधूत तटकरे यांच्या हस्ते झाले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उत्सव सोहळयास सुरुवात झाली. जिल्हा समाज संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार, समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. जयंतीदिनानिमित्त आयेजित चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धाचे बक्षीस वितरण करण्यात आले. सरचिटणिस दिलीप पाबरेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.